सध्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाचे युग असून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत देखील आता मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पद्धतीचा म्हणजे डिजिटल पद्धतीचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतातील खेड्यापाड्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील आता गुगल पे तसेच फोन पे आणि पेटीएम सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून पैसे ट्रान्सफर करण्यापासून तर पैसे स्वीकारण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया पार पाडली जाते.
ही पद्धत यूपीआय वर आधारित असून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल रिचार्ज करणे, कर्जाचे हप्ते तसेच इलेक्ट्रिक बिल भरणे यासारखे बऱ्याच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता बऱ्याच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांकरिता बँकेत जाण्याची गरज भासतच नाही.

आपल्याला माहित आहेस की गुगल पे किंवा फोन पे आणि पेटीएम हे थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म आहेत. परंतु बऱ्याचदा या प्लॅटफॉर्मवरून जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर ते काही चुकीने ज्या ठिकाणी पैसे पाठवायचे त्याऐवजी चुकीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात.
अशा व्यवहाराचे कुठल्याही प्रकारची जबाबदारी गुगल पे किंवा फोन पे घेत नसते. अशावेळी मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास होतो. चुकीच्या खात्यात गेलेले पैसे कसे परत मिळतील? हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. परंतु जर असे झाले तर काळजी करण्याची गरज नसून यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत. तुम्हाला कळेल की चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर कोणत्या पद्धतीने तुम्हाला परत मिळू शकतील.
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास ते परत मिळवण्यासाठी वापरा या तीन पद्धती
1- समजा तुमची देखील चुकीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत तर सगळ्यात अगोदर तुम्हाला संबंधित बँकेला ई-मेल करणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारची जी काही प्रकरणी असतात ती मेलच्या माध्यमातून निकाली काढली जातात. परंतु तरीदेखील या माध्यमातून तोडगा निघाला नाही तर बँकेच्या शाखेत तुम्हाला जावे लागेल. त्या ठिकाणी काही कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल व यानंतर बँक व्यवस्थापक यासंबंधी तुम्हाला उत्तर देऊ शकतात आणि बँकेत पैसे परत मिळवू शकतात.
2- रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार केला तर त्यानुसार जर तुम्ही चुकून दुसऱ्याच्या खात्यात किंवा चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर शक्य तितक्या लवकर बँकेकडे तक्रार करणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत बँक सात ते पंधरा दिवसात तुम्हाला पैसे परत करू शकते.
3- समजा यामध्ये जर तुम्ही ज्याच्या खात्यावर पैसे पाठवले आहे त्याच्याकडून जर पाठवलेले पैसे खर्च केले गेले किंवा दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर केले तर याबाबतीत नियमानुसार तुम्हाला परतावा दिला जाईल व अशाप्रसंगी पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीची जी काही शिल्लक आहे ती मायनस अर्थात ऋणात्मक केली जाते.
4- परंतु या प्रकरणांमध्ये लक्षात एवढेच ठेवावे की जर तुम्ही तुमच्या चुकीच्या खात्यावर यूपीआय मार्फत पैसे पाठवले असतील तर यूपीआय ट्रान्सफर बद्दल तात्काळ बँकेला कळवणे खूप गरजेचे आहे तरच तुम्हाला वेळेवर परतावा दिला जाऊ शकतो.