RBI News : स्वतःचे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र गेल्या काही वर्षांत घरांच्या वाढत्या किंमती, महागाई आणि सतत चढ-उतार करणारे व्याजदर यामुळे घर खरेदी करणे अनेकांसाठी अवघड झाले आहे.
बहुतांश लोक बँकांकडून गृहकर्ज घेऊन अनेक वर्षे ईएमआय भरत घराचे स्वप्न पूर्ण करतात. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने नुकत्याच झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 5.25 टक्के इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात कोणतीही वाढ न झाल्याने गृहकर्जावरील व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
याचा थेट फायदा घर खरेदी करणाऱ्यांना तसेच ईएमआय भरणाऱ्या कर्जदारांना होणार आहे. रेपो दर वाढल्यास बँकांचे कर्ज महाग होते आणि त्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसतो. मात्र यावेळी आरबीआयने व्याजदरात स्थिरता ठेवत सामान्य लोकांना दिलासा दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आत्मविश्वास वाढेल. अग्रवार यांनी सांगितले की, चलनविषयक धोरण समितीच्या या निर्णयामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
त्रेहान आयरिसचे कार्यकारी संचालक अमन त्रेहान यांच्या मते, व्याजदर स्थिर राहिल्याने खरेदीदारांना त्यांच्या ईएमआयचे योग्य नियोजन करता येते, जे गृहखरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्रेहान ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सारांश त्रेहान यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते, व्याजदर स्थिर असल्याने गृहकर्जाच्या ईएमआयचा अचूक अंदाज बांधता येतो आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकून राहतो.
ब्रह्मा ग्रुपचे आशिष शर्मा यांनी आरबीआयने महागाई नियंत्रण आणि आर्थिक विकास यामध्ये योग्य संतुलन साधल्याचे सांगितले. रेपो दर 5.25 टक्के ठेवल्याने बाजाराला स्पष्ट दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
गंगा रिअल्टीचे कार्यकारी संचालक नीरज के. मिश्रा यांनी हा निर्णय गृहनिर्माण बाजारासाठी निश्चिंत करणारा असल्याचे सांगितले. या स्थिरतेमुळे खरेदीदारांमधील भीती कमी होईल आणि ते अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.
विशेषतः मध्यम उत्पन्न गट आणि प्रीमियम गृहनिर्माण क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे. एकूणच, आरबीआयचा हा निर्णय गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.













