200 किलो सोन्याची खरी दागिने, 100 हत्तींचं ऑडिशन आणि…; ‘या’ भारतीय ऐतिहासिक चित्रपटाचे बजेट ऐकून थक्क व्हाल!

Updated on -

चित्रपट म्हटला की त्यात अभिनय, संगीत, कथा यांसोबतच दिसणारी भव्यता देखील महत्वाची असते. अनेक दिग्दर्शक आपल्या चित्रपटात प्रेक्षकांना त्या काळाची जाणीव करून देण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करतात. काही वेळा ही गुंतवणूक इतकी भव्य असते की त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. ‘जोधा अकबर’ हा त्यापैकी एक चित्रपट आहे, ज्यात अभिनेत्री ऐश्वर्या रायने खऱ्या सोन्याचे दागिने परिधान केले होते आणि त्या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी सेटवर तब्बल 50 सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते.

‘जोधा अकबर’ हा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मुघल सम्राट अकबर आणि राजपूत राजकन्या जोधाबाई यांची प्रेमकथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात राजेशाही लूक, ऐतिहासिक वातावरण आणि दर्जेदार अभिनय यामुळे ‘जोधा अकबर’ प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

जोधा-अकबर चित्रपट

या चित्रपटात ऐश्वर्या रायने जी दागिने परिधान केली होती, ती दागिने खऱ्या सोन्याची होती. यासाठी प्रसिद्ध ब्रँड तनिष्ककडून हे दागिने खास तयार करण्यात आले होते. हे दागिने तयार करण्यासाठी 200 कारागिरांनी तब्बल 2 वर्षे मेहनत घेतली. ऐश्वर्या राय हिने विवाहाच्या प्रसंगात जे दागिने परिधान केले होते त्यांचे एकूण वजन 3.5 किलोपेक्षा अधिक होते, तर संपूर्ण शूटिंगदरम्यान तिने वापरलेले दागिने आणि पोशाख मिळून जवळपास 400 किलो वजन झाले होते. इतके जड दागिने परिधान करणे ऐश्वर्यासाठीही आव्हान होते, आणि तिला प्रत्येक वेळेस तयार होण्यासाठी सुमारे 2 तास लागायचे.

चित्रपटाच्या सेटवर वापरले गेलेले दागिने इतके मौल्यवान होते की त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 50 सुरक्षा रक्षकांची तैनाती करण्यात आली होती. हे सर्व रक्षक सतत सेटवर उपस्थित राहायचे, जेणेकरून कोणताही अपघात किंवा चोरी घडू नये.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐश्वर्याच्या लूकची, खास करून तिच्या दागिन्यांची प्रचंड चर्चा झाली. प्रेक्षकांना तिचा राजेशाही अंदाज खूपच भावला आणि त्यानंतर बाजारात अशाच डिझाईनचे दागिने प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले. लग्नसराईत वधूंमध्ये जोधाबाईसारखे दागिने घालण्याची क्रेझ निर्माण झाली.

चित्रपटातील गाणीही ठरली सुपरहीट

या चित्रपटाची आणखी एक खास बाब म्हणजे त्याचं संगीत. ए.आर. रहमान यांचं संगीत आणि जावेद अख्तर यांचे गीत या चित्रपटाच्या यशात मोलाचं योगदान ठरलं. “ख्वाजा मेरे ख्वाजा” आणि “जश्न-ए-बहारा” ही गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात.

‘जोधा अकबर’चा सेटदेखील तितकाच भव्य होता. नितीन देसाई यांनी तयार केलेल्या या सेटवर 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. याशिवाय चित्रपटात वापरण्यात आलेल्या हत्तींसाठीही खास ऑडिशन घेण्यात आले होते. एकूण 100 हत्तींपैकी योग्य हत्तींची निवड करण्यात आली होती.

या सर्व गोष्टी पाहता, ‘जोधा अकबर’ चित्रपट केवळ एक ऐतिहासिक प्रेमकथा नव्हती, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील भव्यतेचा आणि दर्जाचे उदाहरण ठरले. आणि या चित्रपटातील खरे सोन्याचे दागिने हे त्याचं सर्वात मोठं आकर्षण होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!