भारतीय संस्कृतीमध्ये आशीर्वादाला केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर दिव्य शक्तीचा एक स्रोत मानलं जातं. आपण रोजचं पाहतो लहान मुलं वडीलधाऱ्यांच्या पाया पडतात, नम्रतेने त्यांच्या आशीर्वादाची मागणी करतात. पण हा एक साधा कृतीचा भाग नसतो, त्या शब्दांमध्ये एक अशी उर्जा असते, जी संकटात मार्ग दाखवते आणि जीवनात चमत्कार घडवू शकते. याच संदर्भात महाभारतामधील एक हृदयस्पर्शी प्रसंग आजही आठवला जातो, जिथे एका स्त्रीच्या नम्र नमस्काराने संपूर्ण युद्धाच्या दिशेलाच वळवून टाकलं.

महाभारत युद्ध रंगात आलं होतं. कुरुक्षेत्रावर शंखनाद झाला होता. तेव्हा भीष्म पितामहांनी एक कठोर वचन दिलं, की ते अर्जुनाला मारतील आणि युधिष्ठिराला बंदिवान करतील. या घोषणेमुळे पांडवांच्या गोटात खळबळ माजली. कारण भीष्म म्हणजे प्रतिज्ञेवर जीव टाकणारा योद्धा. त्यांनी एकदा काही ठरवलं, की ते अटळच मानलं जातं. त्यांच्या समोर कोणीही उभं राहू शकलं नाही.
द्रौपदीच्या नमस्काराने बदलली युद्धाची दिशा
ही स्थिती अत्यंत चिंताजनक होती. पण श्रीकृष्ण, जे केवळ रणांगणाचे रणनीतीकार नव्हते, तर अधर्माविरुद्ध धर्माचा आधार होते, त्यांनी या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी द्रौपदीला आपल्या सोबत नेलं आणि भीष्म पितामहांच्या छावणीबाहेर उभं केलं. त्यांनी तिच्याकडून केवळ एक कृती करवून घेतली, नम्रतेने नमस्कार.
द्रौपदीने भीष्म पितामहांना वंदन केलं. त्याच क्षणी त्यांच्या ओठांवरून सहज शब्द निघाले “अखंड सौभाग्यवती भव:”. हे केवळ शब्द नव्हते, तर त्या द्रौपदीसाठी हृदयातून आलेल्या शुभेच्छा होत्या. त्यामागे श्रद्धा होती, नम्रता होती. यानंतर भीष्म पितामहांनी द्रौपदीला विचारलं, “कृष्णाने तुला येथे पाठवलं का?” आणि द्रौपदीने केवळ मान हलवून उत्तर दिलं.
…अन् भीष्म पितामहांनी वचन घेतलं मागे
तेव्हा भीष्म पितामह म्हणाले, “माझं वचन फक्त दुसऱ्या वचनाने कृष्णच मोडू शकतो.” त्याच क्षणी, त्यांनी अर्जुनाला मारण्याचं आपलं वचन मागे घेतलं आणि युद्धाच्या रेषाच बदलून गेल्या. एका स्त्रीच्या नमस्काराने, आशीर्वादातून उमटलेल्या शब्दांनी एक अपराजित योद्ध्याच्या विचारातही परिवर्तन घडवलं.
ही कथा आपल्याला केवळ धार्मिक दृष्टिकोनातून शिकवत नाही, तर जीवनातल्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचं मूळ ‘शुद्ध मन:पूर्वक दिलेल्या शुभेच्छांमध्ये’ असतं हे अधोरेखित करते. ज्यावेळी एखादी व्यक्ती मनापासून कोणाला काही चांगलं म्हणते, तेव्हा त्या शब्दांचा परिणाम लांबवर पोहोचतो. आशीर्वाद हे केवळ शब्द नसतात, ते आपल्यासाठी एक अदृश्य कवच असतात, जे संकटांच्या काळात अनपेक्षितपणे मदतीला येतात.