भारतीय रेल्वे आज देशाच्या रक्तवाहिनीसारखी कार्य करत असली, तरी एक काळ असा होता जेव्हा सामान्य प्रवाशांना अगदी मूलभूत सुविधा देखील मिळत नव्हत्या. विशेषतः तृतीय श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना शौचालयांची सोय नव्हती. ब्रिटीश काळात भारतीय प्रवाशांबाबत प्रशासनाचा दृष्टिकोन इतका बेपर्वा होता की, अशा सोयींची गरजच त्यांना वाटत नसे. पण एका सामान्य माणसाने लिहिलेलं एक विनोदी आणि तरीही मन हेलावून टाकणारं पत्र इतकं प्रभावी ठरलं की त्याने संपूर्ण रेल्वे व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकला.

1909 सालचा प्रसंग
1909 सालचा एक प्रसंग भारतीय रेल्वेच्या इतिहासात कायमच लक्षात ठेवला जातो. ओखिल चंद्र सेन नावाचे एक सामान्य भारतीय प्रवासी, जे साहिबगंज स्टेशनवरून प्रवास करत होते, त्यांनी एका अपमानास्पद प्रसंगाचा सामना केल्यानंतर रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं. त्यांना ट्रेन थांबली असताना शौचाला जावं लागलं. परंतु, ते अजून परतलेही नव्हते तोपर्यंत ट्रेन निघाली. हातात धोतर धरून त्यांना ट्रेनचा पाठलाग करावा लागला. या अपमानामुळे त्यांना प्रचंड संताप झाला आणि त्यांनी थेट ब्रिटिश व्यवस्थेला पत्र लिहिले.
ओखिल चंद्र सेन यांनी कलकत्ता रेल्वे बोर्डाला लिहिलेलं ते पत्र आजही ऐतिहासिक मानलं जातं. त्यात त्यांनी ना फक्त स्वतःच्या अनुभवाचं कथन केलं, तर हजारो सामान्य भारतीय प्रवाशांच्या भावना शब्दांत पकडल्या.
…आणि सुरू झाली टॉयलेटची सुविधा
त्या काळात ब्रिटिश अधिकारी असा समज बाळगत होते की, भारतीय प्रवासी लांबचा प्रवास करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अशा सुविधा नकोत. यामागे एक प्रकारचा वर्गभेद होता, कारण उच्च श्रेणीच्या डब्यांमध्ये शौचालयांची सोय होती, पण तृतीय श्रेणीतील प्रवाशांसाठी अशा गोष्टींचा विचारच केला जात नव्हता.
ओखिल चंद्र सेन यांच्या पत्रानंतर रेल्वे बोर्डाने या मुद्द्याला गांभीर्याने घेतलं. त्याच वर्षी, 1909 मध्ये एक ऐतिहासिक आदेश निघाला, ज्यात सर्व लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांमध्ये तृतीय श्रेणीच्या डब्यांमध्येही शौचालये बसवण्याची घोषणा करण्यात आली. अर्थात ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण झाली नाही. गाड्यांमध्ये शौचालयांची सुविधा सर्वत्र पोहोचायला आणखी अनेक वर्षे लागली, पण बदलाची सुरुवात झाली होती.