जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि विशेषतः कन्फर्म तिकीट बुक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 जुलै 2025 पासून, IRCTC च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे आणि जर तुम्ही वेळेत खबरदारी घेतली नाही, तर ऐनवेळी तिकीट मिळणं कठीण होऊ शकतं.

नवीन नियम काय?
भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी आता आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. याचा अर्थ, जर तुमचं IRCTC खाते आधारशी लिंक नसेल, तर 1 जुलैपासून तुम्ही कन्फर्म तिकीट बुक करू शकणार नाही. इतकंच नाही, तर 15 जुलैपासून आणखी एक महत्त्वाचा नियम लागू होतो आहे. प्रत्येक बुकिंगवेळी, आधारशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येणार आणि तो टाकल्याशिवाय बुकिंग पूर्ण होणार नाही.
या बदलामागे रेल्वेचा उद्देश एकच आहे दलालांचा हस्तक्षेप बंद करणं आणि प्रवाशांना प्रत्यक्षात फायदेशीर ठरणारी प्रणाली तयार करणं. आतापर्यंत अनेकदा असे दिसून आलं आहे की दलाल, बनावट आयड्यांचा वापर करून, तात्काळ कोट्यातील तिकिटे आपल्या ताब्यात घेतात आणि सामान्य प्रवाशाला नाहक त्रास होतो. आधार पडताळणी आणि ओटीपी सिस्टममुळे आता हे जास्त दिवस शक्य होणार नाही.
आधार लिंक कसं कराल?
जर तुम्ही अजूनही आधार IRCTC खात्याशी लिंक केलेलं नसेल, तर काळजी करू नका. ही प्रक्रिया फारशी अवघड नाही. फक्त IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा अॅपवर लॉगिन करा, प्रोफाइल सेक्शनमध्ये ‘लिंक आधार’ किंवा ‘Add Aadhaar’ हा पर्याय शोधा. त्यावर क्लिक करून तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा. काही क्षणांतच UIDAI कडून एक ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. तो टाकताच तुमचं केवायसी व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि IRCTC खात्याशी आधार लिंक होईल.
पण, यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड सध्या जो मोबाईल नंबर वापरताय त्याच्याशी लिंक असावं लागेल. जर ते अद्ययावत नसेल, तर नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन लवकरात लवकर ते अपडेट करा. कारण ओटीपी त्याच नंबरवर येईल आणि जर तो नंबरच जुना असेल, तर बुकिंग पूर्णच होणार नाही.