घर म्हणजे केवळ वास्तू नाही, तर आपल्या भावना, सुख-दुःखाचे क्षण आणि कुटुंबातील नातेसंबंध जिथे फुलतात, अशी ती एक जिवंत जागा असते. याच घरातल्या दरवाजाला, म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराला वास्तुशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. कारण असा विश्वास आहे की याच मार्गातून शुभ आणि अशुभ उर्जांचा प्रवेश होतो. त्यामुळे मुख्य दरवाजाशी संबंधित काही लहान पण परिणामकारक गोष्टी लक्षात ठेवल्यास, आपल्या आयुष्यात शांती, आनंद आणि भरभराट येऊ शकते.

वास्तुशास्त्र सांगतं की घराचा दरवाजा केवळ येण्याजाण्याचा मार्ग नसून तो संपूर्ण घराच्या ऊर्जेचा प्रवाह ठरवतो. जर दरवाजाजवळ काही गोष्टींची योग्य व्यवस्था नसेल, तर घरात नकारात्मकता वाढू शकते आणि आर्थिक किंवा मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, जर घराच्या दरवाजासमोरचा रस्ता उंच असेल, तर ही स्थिती वास्तु दोष निर्माण करू शकते. त्यामुळे दरवाजाच्या समोरचा परिसर मोकळा, स्वच्छ आणि समांतर असावा.
गंजलेले कुलूप
गंजलेले कुलूप हे घरात अडथळे आणि अडचणीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे दरवाजावर नेहमी स्वच्छ, कार्यक्षम कुलूप लावलेलं असावं. काही वेळा आपण दरवाजाच्या समोर झाड लावतो, ते सौंदर्यासाठी योग्य असलं, तरी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे अडथळा निर्माण करणारं असू शकतं. असं मानलं जातं की हे झाड शुभ ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतं.
दरवाजाची चौकट
याचप्रमाणे, जर दरवाजासमोर एखादा खांब, गटार किंवा इतर अडथळा असेल, तर कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दरवाजाची चौकट जर तुटलेली, ओलसर किंवा जीर्ण असेल, तर ती गरिबीचं कारण ठरू शकते, असंही वास्तु सांगतं. म्हणून चौकट नेहमी व्यवस्थित आणि मजबूत असावी.
अनेक घरांमध्ये दरवाजावर देवी-देवतांची चित्रं लावलेली दिसतात. पण वास्तुशास्त्र असं सुचवतं की दरवाजावर अनेक देवतांची चित्रं एकत्र लावणं टाळावं. त्याऐवजी एखादं प्रसन्न, सकारात्मक आणि एकात्मतेचं प्रतीक असणारं चित्र अधिक परिणामकारक ठरू शकतं.
दरवाजासमोरील वायर
असंच एक दुर्लक्षित पण महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे दरवाजाच्या वर लटकलेली वायर किंवा त्याचं जाळं. अशा गोष्टी वास्तुशास्त्रात दोषकारक मानल्या जातात. त्यामुळे अशा गोष्टी शक्य तितक्या लवकर दूर करण्याचा सल्ला दिला जातो.