भारतीय रेल्वेचा प्रवास हा देशातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण जर प्रवास करताना आपण थोडीशी बेफिकिरी दाखवली, तर त्याचे परिणाम केवळ तुमच्यापुरते मर्यादित राहत नाहीत ते शेकडो इतर प्रवाशांचंही नुकसान करतात. अलीकडेच रेल्वे प्रशासनाने घेतलेली एक मोठी कारवाई याचं जिवंत उदाहरण आहे. प्रयागराज विभागात नियम मोडणाऱ्या तब्बल 1,567 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत, उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाने रेल्वे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा धडाका सुरु केला आहे. 1 एप्रिल ते 23 जून 2025 या कालावधीत एकूण 3,628 गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात 1,567 लोकांना अटक झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणांचा थेट संबंध आहे ट्रेनमधील ‘आपत्कालीन अलार्म साखळी’च्या गैरवापराशी. म्हणजेच, प्रवासी कोणतीही गंभीर गरज नसताना ट्रेन थांबवण्यासाठी साखळी ओढतात, ज्यामुळे संपूर्ण प्रवासात अडथळा निर्माण होतो.
आतापर्यंत झालेली कारवाई
यातही सर्वाधिक अटक झाली आहे कानपूर सेंट्रल स्थानकावर. या एकट्या स्टेशनवरून तब्बल 230 प्रवाशांना पकडलं गेलं. त्याखालोखाल टुंडला जंक्शनवर 140, फतेहपूरला 133, इटावा जंक्शनवर 130 आणि अलीगढ व मिर्झापूर येथे प्रत्येकी 128 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. प्रयागराज जंक्शन, नैनी, छेओकी आणि फाफुंड येथूनही अनेक प्रवाशांवर कारवाई झाली.
या साखळीचा उद्देश म्हणजे अपघात, अचानक आजार किंवा अशा गंभीर परिस्थितीतच ट्रेनला थांबवणं. पण काही प्रवासी उशीर झालेला सहप्रवासी येईपर्यंत ट्रेन थांबवण्यासाठी, किंवा किरकोळ कारणांनी साखळी ओढतात. यामुळे ट्रेनच्या वेळापत्रकावर परिणाम होतो, इंधनाची नासाडी होते आणि इतर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येते.
किती दंड आकारतात?
रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार, ही साखळी विनाकारण ओढल्यास ₹1,000 दंड किंवा 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. आणि अलीकडच्या कारवाईवरून हे स्पष्ट झालं आहे की रेल्वे आता हे गुन्हे गांभीर्याने घेत आहे.