पर्यावरणातील विविध बदलांमागे अनेकदा निसर्गातील विस्फोटक घटनांचा मोठा वाटा असतो. अशाच एका संशोधनातून समोर आले आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे केवळ पृथ्वीवर परिणाम होत नाही, तर आकाशातील ढगांच्या रचनेवरही मोठा प्रभाव होतो.

एवढेच नव्हे तर, त्या प्रक्रियेमुळे आकाशात बर्फाचे थर तयार होऊ शकतात! हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या (LLNL) वैज्ञानिकांनी याबाबत दिलेल्या माहितीने शास्त्रीय जगतात खळबळ उडवली आहे.
ज्वालामुखीचा उद्रेक
ज्वालामुखी फुटल्यानंतर कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड हे वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात मिसळतात. हे वायू पृथ्वीच्या हवामानावर परिणाम करत असतात. काही वेळा हे वायू वातावरणात थंडी वाढवतात तर काही वेळा तापमान वाढवतात. यासोबतच ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि धूळ वरच्या वातावरणात पोहोचते आणि एरोसोल तयार करते, जिथे ढग बनण्याची प्रक्रिया सुरू होते.
सायरस ढग आणि बर्फ
LLNL संस्थेच्या वैज्ञानिकांनी सांगितले की या एरोसोलमुळे पातळ सायरस ढग तयार होतात. या ढगांमधूनच बर्फाचे थर घडू शकतात. यामध्ये ज्वालामुखीच्या राखेचे कण ‘बर्फाचे केंद्रीकरण’ करतात. म्हणजेच, हे कण बर्फ तयार होण्यासाठी केंद्रस्थानी राहतात आणि त्याभोवती थंड पाण्याचे थेंब गोळा होतात. हे पाणी गोठते आणि बर्फात रूपांतरित होत मोठे बर्फाचे ढग तयार करतात.
शास्त्रज्ञ काय म्हणतात?
या संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ लिन लिन यांनी सांगितले, “आमचे संशोधन हे समजायला मदत करत आहे की ज्वालामुखीचा उद्रेक ढगांच्या निर्मितीवर कसा परिणाम करतो. ज्वालामुखीची राख बर्फ तयार होण्याचं केंद्र बनते.” सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं होतं की पाणी थेट गोठून बर्फ बनेल, पण प्रत्यक्षात बर्फाच्या निर्मितीसाठी राखेच्या कणांनी एक आधार दिला, हे त्यांनी पाहिलं.
हे संशोधन ‘Science Advances’ मध्ये प्रकाशित करण्यात आले असून, यामधून हवामान बदल, ढगनिर्मिती आणि पर्यावरणीय प्रक्रियांबाबत नवे दृष्टीकोन उलगडले गेले आहेत.