जगात अनेक प्राणी भयावह मानले जातात, पण जर तुम्ही कुणालाही विचाराल की सर्वात घाबरवणारा प्राणी कोणता, तर बहुतांश वेळा उत्तर मिळेल साप. त्यातच जर हा साप अत्यंत विषारी असेल, तर भीती अधिकच वाढते. पण, जगात एक असा देश आहे जिथे जगातले सर्वात विषारी साप आढळतात, तरीही तिथे दरवर्षी मृत्यूंची संख्या फारच कमी आहे. हा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. सापांच्या जगात ‘राजा’ मानल्या जाणाऱ्या प्रजाती इथे मुक्तपणे वावरतात, पण आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेमुळे त्यांच्याशी सामना करणंही शक्य होतं.

‘इनलँड तैपन’सर्वात विषारी साप
ऑस्ट्रेलियात सापांची विविधता आणि विषारीपणाचा दर्जा पाहता, इथली स्थिती अतिशय धोकादायक वाटू शकते. विशेषतः ‘इनलँड तैपन’ नावाचा साप, जो इतका विषारी आहे की एका चाव्याने 100 लोकांचा जीव जाऊ शकतो, तो इथे आढळतो.
त्याच्या विषात असलेली घटकद्रव्यं इतकी प्रभावी असतात की रक्तात मिसळताच शरीरावर तीव्र परिणाम दिसून येतात. तरीही, याचा परिणाम फारसा घातक ठरत नाही, कारण ऑस्ट्रेलियात सापांच्या दंशावर त्वरित आणि परिणामकारक उपचाराची सोय आहे.
ऑस्ट्रेलियातील उपचार पद्धती
इथे दरवर्षी सुमारे तीन हजार लोक सर्पदंशाचे बळी ठरतात, विशेषतः ग्रामीण भागात. शेतात काम करताना, झुडपात किंवा घराजवळ साप आढळल्याने हे प्रकार घडतात. पण या प्रकरणांमध्ये त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं आणि अँटीव्हेनम उपलब्ध असल्यामुळे बऱ्याचदा जीव वाचतो. डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी हे सर्पदंशावर तातडीने उपचार कसे करायचे याचं विशेष प्रशिक्षण घेतलेले असतात, त्यामुळेच गंभीर स्थितीतही जीव वाचवता येतो.
हे ऐकून आपल्याला प्रश्न पडतो, मग भारतात एवढे मृत्यू का होतात? भारतात दरवर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे प्राण गमावतात. ग्रामीण भागात अँटीव्हेनम सहज उपलब्ध नसणे, वेळेत उपचार न मिळणे आणि लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव हे यामागचे मुख्य कारण. जर भारताने ऑस्ट्रेलियासारखा आरोग्य व्यवस्थेचा पायाभूत विकास केला, स्थानिक डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण दिलं आणि अँटीव्हेनमचा पुरवठा ग्रामीण भागांपर्यंत वाढवला, तर बऱ्याच लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतील.