भारतातील लोकशाही प्रवासात आणीबाणी ही एक अत्यंत गंभीर आणि ऐतिहासिक घटना मानली जाते. जिथे सामान्य परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण मिळते, तिथे आणीबाणीच्या काळात हे सर्व अधिकार तात्पुरते तरीही पूर्णतः सरकारच्या नियंत्रणाखाली जातात. त्यामुळेच हा विषय केवळ राजकीय नसून, लोकशाही व्यवस्थेतील संवेदनशील भाग आहे.

आपल्याला इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणीबाणीबद्दल बऱ्याचदा ऐकायला मिळतं. पण अनेकांना हे माहीत नसेल की भारतात एकदा नाही, तर तीन वेळा संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांच्या इतिहासात या तिन्ही वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे ही स्थिती ओढवली होती. एकदा राजकीय कारणामुळे आणि दोनदा युद्धजन्य परिस्थितीमुळे.
26 ऑक्टोबर 1962
सर्वप्रथम 26 ऑक्टोबर 1962 रोजी भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करण्यात आली. चीनच्या आक्रमणामुळे भारताच्या सीमांवर धोका निर्माण झाला होता. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरक्षेच्या दृष्टीने हा कठोर निर्णय घेतला. ही आणीबाणी जवळपास 6 वर्षे, म्हणजे 10 जानेवारी 1968 पर्यंत चालू होती. ही काळमर्यादा आजही सर्वात लांब काळ चाललेल्या आणीबाणी म्हणून नोंदली जाते.
3 डिसेंबर 1971
दुसऱ्यांदा, 3 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान आणीबाणी घोषित करण्यात आली. बांगलादेशची निर्मिती, आणि त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या कारवायांनी भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही आणीबाणी आवश्यक मानली गेली. ती काही आठवड्यांचीच होती आणि 17 डिसेंबर 1971 रोजी समाप्त करण्यात आली.
25 जून 1975
तिसरी आणि सर्वात चर्चिलेली आणीबाणी 25 जून 1975 रोजी घोषित करण्यात आली होती आणि यावेळी कारण युद्ध नव्हते, तर राजकीय अस्थिरता होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेतील निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही त्यात हस्तक्षेप करायला नकार दिला.
या निर्णयामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी, इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींकडे आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली आणि राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी ती मंजूर केली.
या काळात सरकारकडून कठोर नियंत्रण ठेवण्यात आले. प्रेसवर सेन्सॉरशिप लादण्यात आली. अनेक विरोधकांना अटक करण्यात आली आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध आले. ही आणीबाणी जवळपास 21 महिने म्हणजे मार्च 1977 पर्यंत चालली.