फक्त एकदाच डागली गेली…अन् तयार झाला एक तलाव! भारतात आहे जगातील सर्वात मोठी तोफ, तब्बल 35 किमीपर्यंत करू शकते स्फोट

Published on -

भारताच्या ऐतिहासिक परंपरेत राजवाडे, किल्ले आणि शस्त्रास्त्रांचा वारसा फार महत्त्वाचा आहे. शौर्य, सामर्थ्य आणि स्थापत्यकलेचा संगम असलेल्या या ठिकाणी अनेक रहस्ये लपलेली आहेत. याच परंपरेचा एक थक्क करणारा भाग म्हणजे जगातील सर्वात मोठी तोफ, जयबान तोफ. ही तोफ केवळ तिच्या आकारामुळे नव्हे, तर तिच्या एका ऐतिहासिक क्षणामुळेही ओळखली जाते. विशेष म्हणजे, ही तोफ फक्त एकदाच डागली गेली होती, आणि त्यावेळी जे घडलं, ते आजही जयपूरच्या लोककथांमध्ये सांगितलं जातं.

जयबान तोफ

ही विशाल जयबान तोफ सध्या जयपूरजवळील जयगड किल्ल्यात ठेवलेली आहे. हा किल्ला अरावली पर्वतरांगेत ईगल्स हिलवर वसलेला आहे, आणि तो जयपूरच्या शासक सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1726 साली बांधला होता. त्याकाळात, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राजे उंच डोंगरांवर किल्ले उभारायचे. जयगड किल्लाही अशाच डोंगरावर उभारलेला आणि अतिशय मजबूत बुरुजांनी संरक्षित आहे.

जयबान तोफेची बांधणी 18व्या शतकात झाली. तिची लांबी सुमारे 20 फूट असून वजन जवळपास 50 टन इतकं प्रचंड आहे. तिच्या एका गोळ्याचं वजन 35 किलो होतं, आणि तिचा मारा इतका ताकदवान होता की, गोळी जवळपास 35 किलोमीटर दूर जाऊन आदळली. त्या वेळी जयगडवरून गोळी डागल्यावर ती थेट चाकसू नावाच्या गावाजवळ जाऊन पडली आणि तिथे एक मोठं तळं तयार झालं, ज्यामध्ये आजही पाणी आहे. ही गोष्ट इतिहासात ‘तोफेच्या एका डागात तलाव तयार झाला’ म्हणून प्रसिद्ध आहे.

कुठे आहे ही जयबान तोफ?

ही तोफ लढाईसाठी वापरली गेली नाही. ती केवळ चाचणीसाठी एकदाच डागण्यात आली होती. या एकाच डागात एवढा प्रचंड आवाज झाला की, त्याचा परिणाम आजूबाजूच्या लोकांच्या श्रवणशक्तीवरही झाला होता. तोफ डागण्याचा खर्चही अफाट होता आणि तिच्यासाठी लागणारी तांत्रिक तयारी, बारुद आणि यंत्रणा केवळ शाही दरबारलाच परडवू शकत होते. त्यामुळे ही तोफ नंतर प्रतीकात्मक अस्त्र म्हणूनच किल्ल्यात जपून ठेवण्यात आली.

जयबान तोफ जयगड किल्ल्याच्या डुंगर दरवाज्यावर ठेवलेली आहे. काही इतिहासकार सांगतात की, जयगड आणि नाहरगड किल्ल्यांमधील जोडणीमुळे ती नाहरगडमध्ये होती असंही समजलं जातं. पण तिचं मुख्य स्थान जयगड किल्ल्यातच आहे. हे दोन्ही किल्ले आजही अरावलीच्या डोंगररांगेत उभे असून, जयपूर शहरावर लक्ष ठेवणारी ही महाकाय तोफ आजही त्या काळच्या सामर्थ्याची आठवण करून देते.

इतिहासाच्या पानांमध्ये जयबान तोफ केवळ एक शस्त्र नव्हे, तर त्या काळातील वैज्ञानिक कौशल्य आणि राजसत्तेची क्षमता याचं प्रतीक बनून राहिली आहे. ती पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक जयगड किल्ल्याला भेट देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!