सुका मेवा, खतं, प्लास्टिक, सिमेंट ते पेट्रोल-डिझेल; इस्रायल-इराण युद्धामुळे भारतात होणार महागाईचा स्फोट?, जाणून घ्या परिणाम!

Published on -

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे आणि याचे पडसाद आता भारतातही उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत इराणसोबत विविध गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करतो. त्यामुळे जर युद्धामुळे व्यापारात अडथळा निर्माण झाला, तर त्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावर होणार आहे. एकीकडे तेलाच्या किमती गगनाला भिडतील, तर दुसरीकडे शेतकऱ्यांपासून ते घरगुती ग्राहकांपर्यंत सर्वांनाच खर्चाचे ओझे वाटायला लागेल.

भारत आपली तब्बल 80 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची गरज पर्शियन आखातातील देशांतून भागवतो. त्यात इराणचा वाटा महत्त्वाचा आहे. युद्ध वाढल्यास इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडथळा निर्माण करू शकतो, आणि हीच सामुद्रधुनी म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. येथे जर शिपिंगला अडथळा निर्माण झाला, तर वाहतूक खर्च प्रचंड वाढेल आणि त्याचा थेट परिणाम होईल पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर. वाहनांच्या इंधनाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम किरकोळ वस्तूंवरही होतो. दूध, भाजीपाला, धान्य , गॅस सर्व काही महाग होऊ शकतं.

भारत इराणकडून काय-काय आयात करतो?

मात्र यात इतकंच नाही, भारत इराणमधून तेलाशिवायही अनेक गोष्टी आयात करतो. काजू, बदाम, पिस्ता, केशर यांसारखे सुकामेवा, तसेच रसायने, खते, मीठ, चुना आणि सिमेंटसारख्या वस्तूही इराणकडून येतात. सुकामेवा आणि फळांचा पुरवठा अडथळ्यात आला, तर त्यांच्या किमती प्रचंड वाढू शकतात, ज्याचा फटका थेट ग्राहकांनाच बसणार. सणासुदीच्या काळात सुकामेव्याचे दर आभाळाला भिडले, तर सामान्य माणसाचे बजेट कोलमडून जाईल.

शेतकऱ्यांनाही या संघर्षाचा फटका बसणार हे निश्चित आहे. भारत इराणमधून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते आणि युरिया आयात करतो. या खतांच्या किमती वाढल्यास शेतीचा खर्च वाढतो आणि परिणामी शेतमाल महाग होतो. यामुळे शेतकरी संकटात सापडतात, तर दुसरीकडे ग्राहकाला फळं-भाज्या, अन्नधान्य महाग दराने घ्यावे लागतात. यामुळे अन्नसाखळीच डगमगू शकते.

भारतामधील निर्यात

या सगळ्याखेरीज आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बासमती तांदळाचा व्यापार. इराण हा भारताच्या बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. 2024-25 मध्ये त्यांनी भारतातून 8.55 लाख मेट्रिक टन बासमती घेतला, ज्याची किंमत ₹6,374 कोटींहून अधिक होती. पण सध्या तणावामुळे पेमेंटमध्ये प्रचंड विलंब होत आहे. काही खाजगी आयातदारांना पैसे द्यायला 6 ते 8 महिने लागत आहेत, आणि सरकार-संलग्न कंपन्या तर 180 दिवसांपेक्षा जास्त वेळ घेत आहेत. त्यामुळे अनेक भारतीय व्यापाऱ्यांनी नफाही न मिळवता इराणऐवजी दुसऱ्या देशांत तांदूळ पाठवायला सुरुवात केली आहे. याचा थेट फटका पंजाब-हरियाणासारख्या बासमती उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे.

एकंदरीत, इराणसोबतचा व्यापार थांबला तर भारतात केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर सुकामेवा, खते, बांधकाम साहित्य, बासमती तांदूळ, रसायनं अशा अनेक क्षेत्रांवर खोलवर परिणाम होईल. आणि याचा परिणाम केवळ आर्थिक मर्यादेत राहणार नाही, तर तो थेट आपल्या घरच्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!