जर एखाद्या भागात युद्ध सुरू झालं, तर त्याचा थेट परिणाम नेहमीच फक्त त्या देशांपुरता मर्यादित राहत नाही, त्याच्या लाटा शेजारील देशांपासून हजारो किलोमीटर दूरपर्यंत पोहोचू शकतात. अशा घटनांमध्ये भारतही अपवाद नाही. सध्या इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव, एकमेकांवरचे क्षेपणास्त्र हल्ले आणि सततचा द्वेष यामुळे युद्धाचे ढग गडगडू लागले आहेत. यामागे राजकीय आणि धार्मिक संघर्ष आहे, पण त्याचे परिणाम पूर्ण आशिया आणि त्यापलीकडेही जाणार आहेत.

भारतासाठी या संकटाचं महत्त्व या कारणानेही अधिक आहे कारण भारताचे इराण आणि इस्रायल दोघांशीही जवळचे व्यापारी संबंध आहेत. विशेषतः इराणबरोबर भारताचं नातं हे अनेक दशकांपासून पुरातन व्यापाराचं आहे. जर हे युद्ध वाढलं, तर त्या नात्याची किंमत देशातील सामान्य नागरिकांना त्यांच्या स्वयंपाकघरात मोजावी लागू शकते.
इराणकडील आयात
भारत इराणकडून मुख्यतः काही अत्यावश्यक वस्तू आयात करतो. सर्वात महत्त्वाचं आहे ऊर्जा. इराण हे पूर्वी भारतासाठी एक मोठं कच्चं तेल पुरवठादार होतं. जरी अमेरिकेच्या निर्बंधांनंतर 2019 पासून थेट तेल खरेदी थांबली असली तरी, एलपीजी आणि एलएनजी यासारखी वायू आधारित उत्पादने अजूनही इराणकडून भारतात येतात. जर युद्ध झालं, तर खाडीमध्ये होणाऱ्या टँकर वाहतुकीवर मोठा परिणाम होईल आणि इंधनाच्या किमतींमध्ये आकाशाला भिडणारी उसळी पाहायला मिळेल.
पण गोष्ट इथेच थांबत नाही. इराणकडून भारतात येणाऱ्या सुकामेवा वस्तू जसे की, बदाम, पिस्ता, खजूर आणि विशेषतः दर्जेदार केशर यांचा पुरवठा खंडित होऊ शकतो. याचा थेट परिणाम भारतीय बाजारात होईल. केशराचा वापर सणासुदीच्या मिठायांमध्ये, लग्नसमारंभांत होणाऱ्या खास जेवणात मोठ्या प्रमाणात होतो. जर हा पुरवठा अडखळला, तर सणांना लागत असलेला ‘शाही चव’च जणू हरवेल.
इराणचे कार्पेट्स, हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रही भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. अशा वस्तूंमधील कारागिरीचा दर्जा आणि सौंदर्य हे अनेक मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय ग्राहकांसाठी आकर्षणाचं केंद्र असतं. युद्धामुळे जर आयात थांबली, तर या गोष्टी ‘लक्झरी’ कॅटेगरीत जातील आणि सामान्य खरेदीदारांवर याचा परिणाम होईल.
रसायनं आणि औद्योगिक खनिजंही भारत इराणकडून खरेदी करतो. मिथेनॉल, बिटुमेनसारखी उत्पादने बांधकाम क्षेत्रात आणि कारखान्यांमध्ये वापरली जातात. या वस्तूंच्या किमती वाढल्यास बांधकाम खर्च वाढेल आणि त्याचा थेट परिणाम घरांच्या किमतींपासून ते रस्त्यांच्या प्रकल्पांपर्यंत दिसून येईल.
भारताकडील निर्यात
पण हे संबंध एकतर्फी नाहीत. भारतही इराणला बासमती तांदूळ, चहा, साखर, औषधे आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा करतो. या वस्तूंना तिथे चांगली मागणी आहे. युद्धामुळे हे व्यापारमार्गही धोक्यात येतील. त्यामुळे भारताच्या निर्यातदारांनाही मोठा फटका बसेल.
त्यामुळे युद्ध अजून वाढलं आणि आयात बंद झाली तर, कच्चं तेल महागणार, वाहतूक खर्च वाढणार, आयात-निर्यात थांबणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील रोजच्या गरजांच्या वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढणार. स्वयंपाकघरात लागणारा तांदूळ, चहा, तेल, सुका मेवा या सगळ्याच गोष्टी अचानक महाग होतील.