पुरीची जगन्नाथ रथयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती श्रद्धेची, भक्तीची आणि सांस्कृतिक एकतेची अद्वितीय प्रचिती आहे. वर्षानुवर्षे लाखो भाविक या पवित्र यात्रेत सहभागी होण्यासाठी ओडिशाच्या पुरी शहरात जमतात. जर तुम्हीही या दिव्य यात्रेचा भाग होण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेणे खूप आवश्यक आहे, कारण ही यात्रा अनुभवण्यासाठी केवळ उत्साहच नाही, तर आध्यात्मिक तयारीही आवश्यक असते.

यात्रेचे प्रमुख दिवस
2025 मध्ये जगन्नाथ रथयात्रा 27 जून रोजी सुरू होणार असून ती 5 जुलैपर्यंत चालणार आहे. हे नऊ दिवस केवळ रथ ओढण्याचे नसून ते संपूर्ण वातावरण भक्तीने भारलेले असते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातून भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलराम आणि भगिनी सुभद्राच्या मूर्ती बाहेर येतात आणि एका भव्य शोभायात्रेत भाग घेतात. या तीन वेगवेगळ्या रथांची उंची आणि रचना देखील अद्वितीय आहे. जगन्नाथांचा 45 फूट उंचीचा रथ 16 चाकांचा असतो, बलरामजींचा रथ 43 फूट उंचीचा असून त्याला 14 चाके आहेत, तर देवी सुभद्राचा रथ 42 फूट उंच असून त्याला 12 चाके आहेत.
“छेरा पहाड” परंपरा
या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे “छेरा पहाड” ही एक प्राचीन परंपरा आहे जिथे पुरीचा राजा स्वतः सोन्याच्या झाडूने रथांच्या समोरील रस्ता झाडतो. ही परंपरा समाजात समानतेचे प्रतीक मानली जाते. राजा आणि सामान्य भक्त यांच्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा, ही भावना इथे प्रकट होते.
स्नान पौर्णिमा
यात्रा सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचा विधी असतो, स्नान पौर्णिमा. या दिवशी तीनही मूर्तींना पवित्र पाण्याने अंघोळ घालण्यात येते आणि त्यानंतर त्या काही दिवस दर्शनासाठी उपलब्ध राहत नाहीत. यावेळी त्यांना ‘अनासरा घर’ नावाच्या जागी विश्रांतीसाठी ठेवले जाते. याला मूर्तींचे शुद्धिकरण मानले जाते.
प्रत्येकाला या रथयात्रेत भाग घेता येतो. कोणताही जात, धर्म, वर्ग वा लिंगभेद नाही. फक्त एक गोष्ट आवश्यक आहे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. असे मानले जाते की, जो कोणी भगवान जगन्नाथाचा रथ ओढतो, त्याचे पाप क्षमाच होते आणि तो जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो.
गुंडीचा मंदिर
यात्रेदरम्यान, भगवानांची मूर्ती श्रीमंदिरातून ‘गुंडीचा मंदिरा’त नेली जाते. हे मंदिरच त्यांच्या आईचे घर मानले जाते, आणि इथे काही दिवस ते मुक्काम करतात. त्यानंतर भगवानांची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते.