भारत आणि पाकिस्तान हे दोन देश राजकीय पातळीवर अनेकवेळा समोरासमोर येत असले तरी, जेव्हा क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा भावना आणखी तीव्र होतात. क्रिकेट हा दोन्ही देशांमध्ये केवळ एक खेळ न राहता अभिमान, इतिहास आणि अस्मितेचा मुद्दा बनतो. त्यामुळेच भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच लोकांच्या विशेष लक्षात असतो. आता, अशाच एका बहुप्रतीक्षित सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने-सामने येण्याची शक्यता आहे आणि ती देखील यंदाच्या आशिया कपमध्ये.

यूएईमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना?
गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, विशेषतः एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर. त्या घटनेनंतर भारतातील विविध स्तरांतून पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, क्रिकेटसारख्या मैत्रीपूर्ण संबंधांवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2025 मधील आशिया कपची तयारी जोरात सुरू असून, हा सामना सप्टेंबरमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिया कपची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होऊ शकते. ही स्पर्धा T20 स्वरूपात आयोजित केली जाणार असून, त्यात भारत आणि पाकिस्तानसोबत श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि यूएई या संघांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे, ह्या वेळी ही स्पर्धा भारतात आयोजित केली जात असूनही, पाकिस्तानच्या सहभागासाठी तटस्थ ठिकाण निवडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यूएई हे प्रमुख पर्यायांपैकी एक असल्याची माहिती आहे.
वेळापत्रक कधी जाहीर होणार?
काही मीडिया रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) लवकरच स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. ही घोषणा जुलैच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध फक्त आशिया कपपुरते मर्यादित राहणार नाहीत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार, दोन्ही देश 5 ऑक्टोबर 2025 रोजी कोलंबोमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषकात आमनेसामने येतील. यानंतर 14 जून 2026 रोजी इंग्लंडमधील एजबॅस्टन येथे महिला T20 विश्वचषकात पुन्हा एकदा दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकतील.