भारतीय चाहत्यांच्या मनात सतत धगधगत असलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने कधी येणार? ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव आणि युद्धजन्य स्थितीमुळे अनेकांना वाटले होते की कदाचित भारत आता पाकिस्तानसोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. पण हे चित्र आता बदलले आहे. युद्धभूमीवर जसे भारताने दमदार प्रत्युत्तर दिले, तसंच आता क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार भिडत होणार आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक 2025
ICC ने महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानाखाली 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमधील सामना.
या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, हे ऑपरेशन सिंदूरनंतरचे दोन्ही देशांमधील पहिले अधिकृत क्रिकेट महायुद्ध ठरणार आहे. त्यामुळे मैदानावरही तणाव, उत्सुकता आणि देशाभिमानाची भावना दिसून येईल, हे निश्चित.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर, हा सामना फक्त क्रिकेटपुरता मर्यादित राहणार नाही, तर हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून पाकिस्तानला युद्धबंदीची विनंती करायला भाग पाडले. अशा पार्श्वभूमीवर हे आमनेसामने येणं म्हणजे एका वेगळ्याच स्तरावरील स्पर्धा आहे.
पाहा वेळापत्रक
या स्पर्धेतील उद्घाटन सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात 30 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. भारतात आणि श्रीलंकेत मिळून 5 विविध मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाईल. 8 संघ सहभागी असलेल्या या टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामनाही लक्षवेधी ठरणार आहे, जो 1 ऑक्टोबरला इंदूरमध्ये रंगणार आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी कोलंबो किंवा बेंगळुरू या पैकी एका ठिकाणी होणार आहे. मात्र, यावेळी सर्वांचे लक्ष हे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे अधिक असणार आहे.