भारतीय शेअर बाजाराने एक इतिहास रचला आहे, जो केवळ आर्थिक जगालाच नव्हे तर जगातील प्रत्येक देशाला थक्क करून सोडणारा आहे. ज्यावेळी अनेक देश आर्थिक अस्थिरतेचा सामना करत होते, त्याचवेळी भारताने अशा प्रकारे उंच भरारी घेतली की जगाने त्याकडे आश्चर्याने पाहिलं. मार्च 2025 पासून सुरू झालेली ही तेजी इतकी जबरदस्त ठरली की भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक ठरला आहे.

भारत शेअर बाजारात नंबर 1
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, केवळ दोन महिन्यांत भारतीय शेअर बाजाराच्या एकूण मूल्यांकनात तब्बल 1 ट्रिलियन डॉलरची भर पडली आहे. ही काही साधी गोष्ट नाही. जगभरातील 10 आघाडीच्या शेअर बाजारांमध्ये भारताने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे पाहून अमेरिका, चीनलाही धक्का बसण्यासारखेच आहे.
आज भारतातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 5.33 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. मार्च ते मे 2025 दरम्यानचा हा प्रवास भारतासाठी केवळ आर्थिक उन्नती नाही, तर विश्वासाच्या पुनःस्थापनेचा काळही ठरला. एकेकाळी घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारा बाजार आता पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे.
स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्येही उसळी
केवळ सेन्सेक्स आणि निफ्टीच नाहीत, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्येही दमदार उसळी पाहायला मिळाली. 4 मार्चपासून 11 जूनपर्यंत सेन्सेक्स 13% म्हणजेच 9,525 अंकांनी वाढला, तर निफ्टीनेही 14% ची वाढ दाखवत 3,058 अंक गाठले. मिडकॅप निर्देशांकात 20.7% आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 26% इतकी प्रचंड वाढ झाली. हे चित्र दर्शवतं की फक्त मोठ्या कंपन्यांनाच नव्हे, तर छोट्या उद्योजकांनाही यशाची संधी मिळत आहे.
ही भरारी काही सहज आलेली नाही. कारण त्याआधी, सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत बाजारात 15% ची मोठी घसरण झाली होती, ज्यामुळे जवळपास 90 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये असमाधान आणि अस्वस्थता होती. मात्र, मार्चपासून जे काही घडलं, त्याने सगळी स्थितीच बदलून टाकली.
जगाच्या तुलनेत भारताने 21% वाढ नोंदवली असून, जर्मनी, कॅनडा, हाँगकाँग, फ्रान्स यांसारख्या देशांनाही मागे टाकलं. अमेरिकेची वाढ फक्त 2.4% होती, तर चीनची 2.7%. हे स्पष्टपणे सांगते की सध्या आर्थिक घडामोडींच्या नकाशावर भारत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरतो आहे.
मात्र, या भरगच्च वाढीत काही काळजी घेण्यासारख्या गोष्टीही आहेत. विश्लेषकांचे म्हणणे आहे की काही क्षेत्रे जसे की आयटी, ग्राहक वस्तू आणि गुंतवणूकसंबंधी कंपन्या सध्या खूपच महागड्या दराने व्यापार करत आहेत. उत्पन्न वाढीचा वेग जर कमी राहिला, तर बाजारात दुरुस्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमाईच्या अंदाजातही थोडीशी निराशा आहे. वित्तीय वर्ष 2025 साठी निफ्टीचा EPS जेमतेम 0.3% ने वाढला आहे, आणि 2026-27 साठी त्यात कपात झाली आहे. याचा अर्थ म्हणजे येणाऱ्या काळात बाजार थोडा सावधगिरीने वाटचाल करू शकतो.
गुंतवणूकदारांचे ‘या’ क्षेत्राकडे लक्ष
भारत-पाकिस्तान तणावानंतर, गुंतवणूकदारांनी संरक्षण आणि ड्रोन क्षेत्राकडे झुकण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्ससारख्या कंपन्यांचे शेअर्स वर गेले आहेत, आणि भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे.
सध्या भारताचा मार्केट कॅप अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर पाचव्या स्थानावर आहे. हे केवळ एक आकड्याचं प्रदर्शन नाही, तर भारतातील गुंतवणूकदारांचा, उद्योजकांचा आणि सरकारच्या धोरणांचा यशस्वी संगम आहे.