तुम्हाला माहिती आहे का, की एक काळ असा होता जेव्हा भारतीय गाड्यांमध्ये शौचालयेच नव्हती? ही बदल घडवणारी कहाणी एका सामान्य माणसाच्या अपमानाने सुरू झाली आणि अखेर ब्रिटिश राजवटही झुकली.
भारतात 19 व्या शतकात रेल्वेची सुरुवात झाली, तेव्हा शौचालये गाड्यांमध्ये नव्हती. 1853 मध्ये पहिली ट्रेन सुरू झाल्यानंतरही तब्बल 50 वर्षांपर्यंत ही मूलभूत गरज दुर्लक्षित राहिली.

आणि असे होण्यामागच कारण त्यावेळी प्रवासाचे अंतर कमी होते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते अत्यावश्यक वाटले देखील नाही.
‘तो’ अपमानजनक प्रसंग
त्याच झालं असं 2 जुलै 1909 रोजी बंगालमधील ओखिल चंद्र सेन या प्रवाशास अहमदपूर स्टेशनवर ट्रेनमध्ये प्रवास करताना शौचास जावे लागले. ट्रेनमध्ये शौचालय नसल्यामुळे तो स्टेशनवर उतरला आणि तेवढ्यात ट्रेन निघून गेली.
एक हातात लोटा आणि दुसऱ्या हातात धोतर घेऊन धावणारा सेन हे दृश्य अनेकांना हास्यास्पद वाटले. पण सेनसाठी हा अनुभव अपमानास्पद आणि अस्वस्थ करणारा होता.
अपमानाने व्यथित झालेल्या सेनने रेल्वेच्या हबीबगंज विभागीय कार्यालयाला एक सडेतोड पत्र लिहिले. या पत्रात त्याने गाड्यांमध्ये शौचालयांची गरज प्रभावीपणे मांडली. त्याच्या पत्राने ब्रिटिश अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि त्यांनी शौचालये जोडण्याच्या गरजेचे महत्त्व प्रथमच मान्य केले.
या घटनेनंतर 80 किमीपेक्षा जास्त अंतर प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये शौचालये अनिवार्य करण्यात आली. सुरुवातीला फक्त उच्च श्रेणीतील डब्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली, पण नंतर सर्व श्रेणींमध्ये ती लागू करण्यात आली. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
लोको पायलटसाठी सुविधा
विशेष म्हणजे, लोको पायलटसाठी इंजिनमध्ये 2016 पूर्वी शौचालयच नव्हते. 2016 नंतर नवीन इंजिन डिझाइनमध्ये ती सुविधा समाविष्ट करण्यात आली, जेव्हा ही बाब गांभीर्याने घेतली गेली.
ओखिल चंद्र सेन यांनी लिहिलेलं ते ऐतिहासिक पत्र आजही दिल्लीच्या नॅशनल रेल म्युझियममध्ये सुरक्षित आहे. त्यांच्या एका छोट्याशा कृतीने संपूर्ण रेल्वे व्यवस्थेत मूलभूत आणि मानवी गरज म्हणून ओळखली जाणारी सोय निर्माण झाली.
ही कथा केवळ शौचालयांबद्दल नाही, ती आहे एका सामान्य माणसाच्या आवाजाची ताकद दाखवणारी. ओखिल सेन यांनी अपमान सहन केला नाही, प्रतिक्रिया दिली – आणि ती प्रतिक्रिया इतिहास घडवणारी ठरली.