भारतीय नागरिक म्हणून विदेशात प्रवास करताना पासपोर्ट आणि व्हिसा ही दोन अत्यावश्यक कागदपत्रं असतात. परंतु या जगात काही देश असेही आहेत, जिथे भारतीयांना या दस्तऐवजांशिवायही प्रवेश दिला जातो आणि तेही पूर्ण कायदेशीर पद्धतीने. ही माहिती काहीशी आश्चर्याची वाटते, पण ती खरी आहे. भारताच्या काही पारंपरिक मित्रदेशांनी भारतीयांसाठी असे सुलभ नियम ठेवले आहेत जे प्रवासाची प्रक्रिया अधिक सोपी आणि अनौपचारिक करतात.

नेपाळ आणि भूतान
नेपाळ आणि भूतान हे दोन देश भारताच्या इतके जवळचे आणि सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहेत की, त्यांच्या सीमांवर एक प्रकारची मोकळीक आहे. नेपाळच्या बाबतीत बोलायचं झालं, तर 1950 सालापासूनच भारत आणि नेपाळमध्ये ‘भारत-नेपाळ मैत्री करार’ आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात सहजपणे येता-जाता येते.
नेपाळला जाण्यासाठी भारतीयांना फक्त ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र इतकंच पुरेसं असतं. त्यामुळे काठमांडू, पोखरा किंवा पवित्र पशुपतिनाथ मंदिरासारख्या ठिकाणी भारतीय सहजच पोहोचू शकतात.
तसंच भूतानबाबतही असेच नियम आहेत. भारत आणि भूतानमधील संबंध कायमच सलोख्याचे आणि शांततामय राहिले आहेत. भूतानमध्ये भारतीय नागरिकांना कोणत्याही व्हिसाशिवाय फक्त ओळखपत्रावर प्रवेश दिला जातो. मात्र, एक मर्यादा लक्षात ठेवावी लागते, हा परवानगीचा कालावधी 14 दिवसांपुरताच असतो. त्यामुळे जरी भूतानमध्ये प्रवेश सहज मिळत असला तरी, त्यासाठी नियोजन आवश्यक असतं. भूतानच्या पर्वतीय सौंदर्याचा अनुभव घेण्याचा योग अगदी पासपोर्टशिवाय जुळू शकतो, हेच विशेष.
श्रीलंका आणि बांगलादेश
पूर्वी, श्रीलंका आणि बांगलादेशलाही अशा मोकळ्या स्वरूपात भारतीय नागरिकांना भेट देता येत असे. पण गेल्या काही वर्षांतील राजकीय व धोरणात्मक बदलांमुळे या दोन्ही देशांनी आता व्हिसा आणि पासपोर्ट अनिवार्य केले आहेत. विशेषतः बांगलादेशातील वाढती अस्थिरता आणि श्रीलंकेत घडलेले काही घटनाक्रम यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे निर्णय घेण्यात आले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, जागतिक स्तरावर जेव्हा दोन देशांमध्ये परस्पर सन्मान, विश्वास आणि मैत्री असते, तेव्हा अशा विशेष सवलती शक्य होतात. नेपाळ आणि भूतान हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत