मनी प्लांट हे रोप नशीब, समृद्धी आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याशी संबंधित आहे. तुम्ही कोणत्याही घरात गेलात, तर कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला हे रोप दिसेलच. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात येते, ती म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे रोप तसंच ताजंतवानं वाढत नाही. कुठं त्याची पानं पिवळी पडतात, तर कुठं ते सुकायला लागतं. मग असं काय विशेष करतात ते लोक ज्यांचं मनी प्लांट नेहमी हिरवंगार असतं?

उन्हाळ्यात या रोपाची विशेष काळजी आवश्यक असते. जरी मनी प्लांटवर फारसे उपचार लागत नाहीत, तरीही कडक उन्हात त्याची पाने झपाट्याने पिवळी पडू लागतात. त्यामुळे त्याची वाढ थांबते आणि पानं कोमेजतात. पण एक साधी घरगुती युक्ती तुम्ही वापरलीत, तर तुमचं मनी प्लांट पुन्हा भरभरून फुलायला लागेल आणि ती युक्ती आहे तांदळाचं पाणी.
करा ‘हा’ उपाय
तांदूळ शिजवताना किंवा धुताना त्यात अनेक पोषणतत्त्वं मिसळलेली असतात जसं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन B आणि स्टार्च. हे घटक झाडासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात आणि विशेषतः सुकलेल्या किंवा वाढ थांबलेल्या झाडांना नवसंजीवनी देतात.
तांदूळ धुतल्यावर ते पाणी फेकून न देता एका भांड्यात गोळा करा. त्यानंतर ते पाणी तुम्ही मनी प्लांटला घाला. हे पाणी दर 15 दिवसांनी एकदा झाडाच्या मुळाजवळ टाका. मात्र, फारसं पाणी घालायचं नाही, फक्त माती ओलसर राहील इतकंच पाणी द्या.
तुम्हाला हवं असल्यास, हेच पाणी एका स्प्रे बाटलीत भरून मनी प्लांटच्या पानांवर हलकं फवारता येतं. यामुळे पानं ताजीतवानी दिसतील आणि त्यांची वाढही चांगली होईल.
‘ही’ चूक टाळा
तांदळाचे पाणी थेट आणि जास्त प्रमाणात वापरू नका. तुम्ही तांदूळ शिजू घालताना जर त्यात पाणी उरले असेल तर ते देखील रोपाला घालू शकता.
पण, ते पाणी थोडं पातळ करूनच रोपाला द्या. हा उपाय करत असताना, रोपाला थेट कडक उन्हात ठेवणं टाळा. त्याऐवजी नैसर्गिक प्रकाश मिळेल, पण थेट ऊन पडणार नाही अशा जागी ठेवा.