पुरीच्या जगन्नाथ मंदिरात पाय ठेवताना भाविकांच्या मनात केवळ भक्ती नसते, तर एक अनाम जिव्हाळाही असतो. भगवान श्रीकृष्ण, त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे हे मंदिर अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. पण या मंदिरात अशी एक पायरी आहे जिच्यावर पाय ठेवणं मोठं पाप मानलं जातं आणि हे ऐकून कुणाचंही मन थोडं दचकायला लावेल.

आज आपण याच पायरीचं आणि तिच्याशी संबंधित पौराणिक कथांचं अनोखं रहस्य उलगडून पाहणार आहोत.
पौराणिक कथा
पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या 22 पायऱ्यांपैकी तिसरी पायरी ही खास मानली जाते. मंदिरात चढताना अनेक भाविक ती पायरी मुद्दाम ओलांडतात, तिला हात लावून वाकून नमस्कार करतात, पण का? यामागे एक अतिशय भावनिक आणि धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेली कथा आहे. असं सांगितलं जातं की, एकदा यमराज स्वतः भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी त्यांच्यासमोर एक गंभीर प्रश्न मांडला.
त्यांनी म्हटलं की, “प्रभू, तुमचं दर्शन घेतल्यावर पाप मिटतं, मग कोणीच यमलोकात येत नाही, मग मी काय करू?” हे ऐकून भगवान जगन्नाथांनी त्यांना एक अद्भुत उपाय सांगितला. त्यांनी यमराजांना तिसऱ्या पायरीवर स्थान घेण्यास सांगितलं आणि म्हणूनच असं मानलं जातं की जो कोणी त्या पायरीवर पाऊल ठेवतो, त्याच्या पुण्यकर्मांवर विराम लागतो आणि त्याला यमलोकात जावं लागतं.
हजारो भाविक आजही या कथेला लक्षात ठेवून त्या पायरीचं पूजन करतात, तिचा स्पर्श करत नाहीत. काहीजण तर त्या पायरीवर रुमाल ठेवूनच पुढे जातात, कारण त्यांच्या मनात त्या पायरीबाबत दाटलेला आदर असतो.
अशा अनेक कथा आणि विश्वासांनी पुरीचं हे मंदिर वेढलेलं आहे. केवळ वास्तुरचना, मूर्ती किंवा परंपरा नव्हे, तर या मंदिराचा प्रत्येक कोपरा काहीतरी बोलतो आणि या सगळ्यात ती तिसरी पायरी, जिच्यावर पाय न ठेवण्याची परंपरा अजूनही पाळली जाते.