भारतात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची आणि संस्कृतींची एक सुंदर भेट असते. इथल्या विविध प्रांतांमध्ये लग्नाच्या परंपराही तितक्याच रंगीबेरंगी आणि अनोख्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की बिहारमध्ये एक अशी जागा आहे, जिथे प्रत्यक्षात वरांचा बाजार भरतो? हो, तुम्ही अगदी खरं ऐकताय आणि ही परंपरा तब्बल 700 वर्ष जुनी आहे.
मधुबनीमधील अनोखी विवाह परंपरा

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात, दरवर्षी जून-जुलै महिन्यात ‘सौराठ सभा’ नावाच्या ठिकाणी हा अनोखा वरांचा बाजार भरतो. या ठिकाणी अनेक कुटुंबं आपल्या मुलींसाठी वर शोधण्यासाठी एकत्र येतात. मुलीचे आई-वडील किंवा नातेवाईक या सभेत सहभागी होतात आणि इच्छेनुसार योग्य वर निवडण्याचा प्रयत्न करतात. हे प्रकरण अगदी विवाह मेळाव्याप्रमाणेच असते, पण खास बाब म्हणजे इथे सर्व काही अगदी पारदर्शकपणे आणि नियमबद्ध पद्धतीने घडतं.
या बाजारात वरांची संपूर्ण माहिती त्यांचे शिक्षण, उत्पन्न, कौटुंबिक पार्श्वभूमी, तसेच कुंडली या सर्व गोष्टी आधीच उपलब्ध करून दिल्या जातात. काही वेळा तर मुलांची “दर यादी”ही तयार केली जाते. यामुळे मुलीच्या पालकांना निर्णय घेणे सुलभ होते. सुरुवातीला ही परंपरा केवळ मैथिल ब्राह्मण आणि कायस्थ समाजापुरती मर्यादित होती, पण आज ही परंपरा सर्व समाजांसाठी खुली झाली आहे.
काय आहे सौराठ सभा?
इतिहास सांगतो की, प्राचीन काळात गुरुकुलात शिक्षण घेत असलेली मुले सौराठ सभेसाठी आणली जात. त्यांची योग्यता आणि संस्कार पाहून त्यांच्या आयुष्यातील जोडीदार ठरवले जात. हे लग्न जुळविण्याचे कार्य फक्त घरच्यांनी नव्हे, तर समाजाच्या जाणकार सदस्यांनी एकत्र बसून केले जाते. या बाजारात लग्न निश्चित करताना ‘कोणत्याही मध्यस्थाशिवाय’ थेट दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा होते.
आजच्या डिजिटल युगात जरी मॅट्रिमोनियल वेबसाइट्स आणि अॅप्स असले, तरी या पारंपरिक सौराठ सभेचे आकर्षण अद्यापही शाबूत आहे. ही परंपरा फक्त विवाह ठरविण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक सामाजिक संवादाची जागा बनली आहे जिथे शेकडो कुटुंबं एकमेकांशी संवाद साधतात, विचारांची देवाणघेवाण करतात, आणि संस्कृती जपतात.
सौराठ सभा ही एक परंपरा आहे, जी काळानुसार विकसित झाली असली, तरी तिच्या मुळातील भारतीय मूल्यं अजूनही जिवंत आहेत. जिथे विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा प्रश्न नसतो, तर तो आपुलकी, सुसंवाद आणि सामाजिक जबाबदारीचं प्रतीक मानला जातो.