जगभरात जेव्हा ऊर्जा संकटाची चर्चा होते, तेव्हा अनेक देश अद्यापही तेल, वायू यासारख्या पारंपरिक इंधनांवर अवलंबून आहेत. मात्र भारत आता या साखळीमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक आशावादी घोषणा केली, “फक्त 6-7 वर्षांची गोष्ट आहे, आता भारत ऊर्जा क्षेत्रात एक शक्तिशाली निर्यातक देश बनेल.” ही घोषणा केवळ एक राजकीय वक्तव्य नाही, तर भारताच्या उर्जेच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी आहे.

ऊर्जा क्षेत्राबाबत मोठा फ्युचर प्लॅन
सध्या भारत ऊर्जा गरजांकरता रशिया, सौदी अरेबिया, युएई आणि अमेरिकेसारख्या देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तेल व वायू आयात करण्यासाठी देशाच्या खजिन्यावर मोठा आर्थिक भार पडतो. परंतु पर्यायी इंधनांच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलू शकते. सरकारने सध्या हायड्रोजन, इथेनॉल, बायोडिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यायांवर भर दिला आहे. गडकरी यांच्या मते, हायड्रोजन हे भविष्यातील सर्वात मोठं इंधन बनणार असून, ते स्वस्तही असेल आणि प्रदूषणमुक्तही.
या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर भारतात पायाभूत सुविधांचाही झपाट्याने विकास होत आहे. रस्ते, महामार्ग, लॉजिस्टिक कोरिडोर्स आणि वाहतुकीच्या नव्या मार्गांमुळे वस्तू वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो आहे. सध्या भारताचा लॉजिस्टिक्स खर्च GDP च्या जवळपास 16% आहे, जो अमेरिका, युरोप आणि चीनपेक्षा जास्त आहे. परंतु सरकारच्या प्रयत्नांमुळे तो 9% पर्यंत खाली आणण्याचं लक्ष्य यावर्षीच्या अखेरीस गाठलं जाणार आहे.
पर्यायी इंधनांनी भारताचे भविष्य बदलणार
ऊर्जा आयात कमी झाली की देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा भारही हलका होतो. त्याचवेळी, देश आपली ऊर्जा स्वतः निर्माण करू लागतो तेव्हा ती परदेशात विकून कमाईही करू शकतो. अशा स्थितीत भारत केवळ स्वतःसाठीच नाही, तर जागतिक ऊर्जा बाजारातही एक विश्वासार्ह भागीदार बनू शकतो. अमेरिका आणि रशियासारख्या बलाढ्य देशांच्या बरोबरीने भारत उभा राहील, ही कल्पना आता अशक्य वाटत नाही.
स्वावलंबनाचं हे स्वप्न केवळ तांत्रिक किंवा आर्थिक नाही, तर एक सामाजिक बदलही आहे. शेतकऱ्यांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत, प्रत्येकाच्या जीवनशैलीत बदल घडवणारे हे पाऊल आहे. स्वच्छ ऊर्जा ही पर्यावरणासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही वरदान ठरते. येत्या काही वर्षांत जर भारत ऊर्जा क्षेत्रात निर्यातदार म्हणून नाव कमावू शकला, तर ते आपल्या विकासाच्या गतीसाठी एक ऐतिहासिक वळण ठरेल.