सध्या जे उष्णतेचे तीव्र लाटेचे दिवस आपण अनुभवतो आहोत, ते केवळ हवामानातील सामान्य बदल आहेत का, की खरंच हा मानवजातीसाठी एक मोठा इशारा आहे? उन्हाच्या झळा शरीराला झोंबतात, पण मनालाही एक विचित्र अस्वस्थता जाणवते. अशा वेळी अनेकांची नजर वळते ती प्राचीन धर्मग्रंथांकडे आणि विशेषतः विष्णू पुराणात दिलेल्या त्या गूढ आणि धक्कादायक भविष्यवाणीकडे.

विष्णू पुराणातील कथा-
विष्णू पुराणात ऋषी पराशरांनी आपल्या शिष्याला सांगितलेली कथा एक काळ आठवण करून देते, जेव्हा पृथ्वी तिच्या शेवटच्या पर्वावर पोहोचते. त्यांनी वर्णन केलेले चित्र इतके भयंकर आहे की सध्याची असह्य उष्णता त्या चित्राची केवळ झलक वाटावी. पराशर ऋषींनी स्पष्ट सांगितले होते की, जगात एक असा काळ येईल जेव्हा उष्णता इतकी प्रखर होईल की पृथ्वीवर पाणी राहणार नाही. पाऊस येणे बंद होईल, नद्या सुकतील आणि दुष्काळ हीच नवी वस्तुस्थिती बनेल.
आजचे चित्र पाहिले तर, याबाबत नक्कीच प्रश्न पडतो. अनेक जलाशय कोरडे पडले आहेत, जंगल आगीत होरपळत आहेत आणि रोजच्या बातम्यांमध्ये तापमानाचे विक्रम मोडले जात आहेत. हवेतील बदल, वायू प्रदूषण, ओझोनच्या थराला झालेली हानी या साऱ्याचा परिणाम म्हणजे एक अनिश्चित भविष्य.
विष्णू पुराणातील भविष्यवाणी
पण विष्णू पुराणाच्या भविष्यवाणीमध्ये केवळ दुष्काळच नाही, तर त्यानंतर येणारा एक महापूर, आणि त्या नंतरची प्रलयाची साखळीही स्पष्टपणे सांगितली आहे. असा प्रलय, जो केवळ पृथ्वीवर नाही तर तीनही लोकांवर म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ गाजवेल. सूर्याचे सात किरण स्वतंत्र सूर्यांमध्ये रूपांतरित होतील आणि त्यांच्या ज्वाळांनी सर्व काही भस्म होईल. शेवटी, भगवान विष्णू स्वतः शेषनागाच्या मुखातून प्रलयाग्नि प्रकट करतील आणि त्यानंतर वादळ, पाऊस आणि वाऱ्यांच्या महाभयानक लाटांनी जग पूर्णतः नष्ट होईल.
हे वर्णन केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता, आपण आज जे भोगतो आहोत त्याच्या पार्श्वभूमीवर बघितले, तर हे एक दैवी इशारा वाटावा इतकं वास्तविक आणि भयावह आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी बेपर्वाई यामुळे आज आपण विनाशाच्या दिशेने जात आहोत की काय, असा प्रश्न नक्कीच पडतो.