भारतीय पुराणांमध्ये ‘पाताळ लोक’ म्हणजे पृथ्वीच्या खाली असलेली एक वेगळीच अद्भुत दुनिया असल्याचं वर्णन आढळतं. रामायणात पाताळ लोकाचा उल्लेख राम व लक्ष्मणाच्या अपहरणाच्या कथेत येतो, जिथे हनुमानजींनी या लोकांपर्यंत पोहोचून राम-लक्ष्मण यांची सुटका केली होती. सध्या एका पॉडकास्टमधून या पाताळ लोकाचा अमेरिकेशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

रामायणातील पाताळ यात्रा
रामायणानुसार, अहिरावण नावाच्या राक्षसाने राम व लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळ लोकात नेले होते. विभीषणाच्या सांगण्यावरून हनुमानजी पाताळ लोकात गेले आणि तिथे मकरध्वज नावाच्या एका शक्तिशाली द्वारपालाशी त्यांची भेट झाली. विशेष म्हणजे, मकरध्वज स्वतःला हनुमानजींचा पुत्र असल्याचा दावा करतो. हनुमानजींनी त्याला पराजित केल्यानंतर पाताळ लोकाचा राजा होण्याचा आशीर्वाद दिला.
हनुमानजींनी म्हटलं होतं की पाताळ लोकांतील जनता मकरध्वजाची भक्तीपूर्वक पूजा करतील. या कथेला आधार मानून काहीजण मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीशी या गोष्टी जोडू लागले आहेत. माया संस्कृतीत वानर देवतेचे उल्लेख, चित्रं आणि मूर्ती आढळतात, जे या दाव्याला आधार देण्याचा प्रयत्न करतात.
अमेरिकेशी संबंध?
पॉडकास्टमध्ये भौगोलिक बाबींवर भर दिला गेला आहे. त्यानुसार, मध्य अमेरिका ही भारताच्या भूगोलाच्या अगदी विरुद्ध बाजूस आहे. त्यामुळे हा ‘पृथ्वीखालील’ भाग असल्याचा अंदाज मांडला जातो. पण हे पूर्णपणे अनुमानाधारित असून कोणतीही वैज्ञानिक वा ऐतिहासिक पुष्टी उपलब्ध नाही.
ही माहिती @bloodysatya या इन्स्टाग्राम हँडलवरील पॉडकास्ट व्हिडिओमधून समोर आली आहे. हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला असून अनेकांनी त्यावर विश्वास व्यक्त केला, तर काहींनी केवळ गूढकल्पना म्हणून त्याकडे पाहिलं.