आजपर्यंत आपण इतिहासात असे अनेक शासनकर्ते पाहिले आहेत, जे आपल्या क्रूरतेमुळे प्रचलित आहेत. मात्र, इतिहासात एक राणी अशी देखील आहे, जिच्या कृत्याचा पाढा ऐकून अंगाला थरकाप आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा आहे एका अशा राणीची, जिला तिच्या कुटुंबाचा जीव घ्यायला क्षणभरही विलंब वाटला नाही. ही राणी म्हणजे मादागास्करची राणावलोना पहिली. इतिहासामध्ये ती एक अत्यंत शक्तिशाली, पण तितकीच क्रूर समजली जाते. तिच्या काळातील तिच्या निर्णयांनी हजारो निष्पाप लोकांच्या आयुष्याचा अंत झाला आणि तिच्या शासनपद्धतीने संपूर्ण देशात भीतीचं सावट निर्माण केलं.
राणावलोना पहिली-

राणावलोना पहिली मूळची एका शेतकऱ्याची मुलगी होती. तिचं नाव होतं राबोडोंड्रियानापोइनिमेरिना. तिच्या वडिलांनी एकदा मादागास्करच्या राजाचं रक्षण केलं आणि त्या कृतीमुळेच तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. तिला राजघराण्यात प्रवेश मिळाला आणि ती राजकुमार रादामा यांच्याशी विवाहबद्ध झाली. पुढे जेव्हा राजा रादामा प्रथमचा मृत्यू झाला, तेव्हा राबोडोंड्रियानापोइनिमेरिना राणी राणावलोना पहिली म्हणून मादागास्करच्या गादीवर विराजमान झाली.
सिंहासनावर आल्यानंतर राणीने केवळ राजकीय शत्रूंवरच नव्हे, तर सामान्य नागरिकांवरही आपली क्रूर सत्ता प्रस्थापित केली. तिच्या कारकिर्दीत हजारो लोकांचा मृत्यू झाला. विरोधकांना केवळ तुरुंगात टाकणं किंवा हद्दपार करणं पुरेसं नव्हतं. ती त्यांना जिवंत जाळायची, त्यांच्या अवयवांची कापाकाप करायची. धार्मिकदृष्ट्या ख्रिश्चन धर्माचे अनुयायी तिच्या विशेष रागाचे लक्ष्य होते. युरोपियन मिशनऱ्यांना देशातून हाकलून लावण्यात आलं आणि जे मागे राहिले, त्यांना अमानुष पद्धतीने ठार मारण्यात आलं.
विचित्र प्रथा
तिच्या कारकिर्दीत एक विचित्र प्रथा होती लोकांनी आपली निरपराधिता सिद्ध करण्यासाठी विष प्यावं लागायचं. जर कोणी उलटी करत असेल तर त्याला निर्दोष मानलं जाई, आणि न केल्यास मृत्यू निश्चित असे. ही निर्दयी चाचणी राणीच्या न्यायव्यवस्थेचा भाग होती. या अमानुषतेमुळे हजारो जणांनी आपला जीव गमावला.
राणावलोना पहिलीने गुलामगिरीलाही समाप्त केलं नाही. उलट, गुलामांवर ती इतकी क्रूर होती की, त्यांच्या आयुष्याला नरक बनवून टाकलं. गुलामांवर अती कठोर कामाचा बोजा टाकला जाई आणि जर त्यांनी थोडाही विरोध केला, तर त्यांना फाशी देण्यात यायची किंवा इतर अमानुष पद्धतीने ठार मारण्यात येत असे.
तिचा एक उद्देश मात्र स्पष्ट होतामादागास्करवर युरोपियन संस्कृतीचा प्रभाव रोखणे. तिने स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक निर्णायक पावलं उचलली. मात्र, या पावलांची किंमत प्रजेने स्वतःच्या जीवाने चुकवली. तिचं राज्य म्हणजे एक भितीदायक आणि अशांत काळाची छाया होती, जिथे न्यायाच्या नावाखाली निर्दयता चालायची. इतिहास तिच्याकडे एका अत्यंत कठोर आणि क्रूर शासक म्हणून पाहतो. ती राणी असली, तरी तिचं राज्य लोकांसाठी एक दहशतीचं युग ठरलं.