सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका, म्हणजेच कार्डियाक अरेस्टच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कुणीतरी अचानक कोसळतो, श्वास घेणे बंद होते, आणि काही क्षणांत आयुष्य थांबतं. अशा प्रसंगांची बातमी ऐकून मन सुन्न होतं. पण एक प्रश्न सगळ्यांना सतावतो खरंच, कोणत्या वयात याचा धोका सर्वाधिक असतो? आणि आपण वेळेपूर्वी सावध राहिलो, तर ही गंभीर वेळ टाळता येईल का?

कार्डियाक अरेस्ट ही एक अशी स्थिती आहे जिथे हृदयाचं काम अचानक थांबतं. हृदयाच्या ठोक्यांचा ताळमेळ बिघडतो आणि त्यामुळे शरीरात रक्तपुरवठा थांबतो. ही एक अत्यावश्यक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. काही मिनिटांत योग्य मदत मिळाली नाही, तर जीव जाण्याची शक्यता जास्त असते.
कार्डियाक अरेस्टचा सर्वाधिक धोका कुणाला?
पूर्वी हृदयविकाराचा धोका 45 वर्षांनंतर वाढतो असं मानलं जायचं. वय वाढतं तसं शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्या डोके वर काढतात. पुरुषांमध्ये हा धोका 45 नंतर वाढतो, तर महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजे सुमारे 55 ते 60 वयात हा धोका अधिक होतो. पण आता ही मर्यादा मागे पडत आहे.
अलीकडच्या काळात तरुणांमध्येही कार्डियाक अरेस्टचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. अगदी 20-30 वयातही अनेक खेळाडू, तरुण कर्मचारी किंवा अगदी सामान्य व्यक्ती अशा स्थितीत मृत्युमुखी पडताना दिसत आहेत. यामागे कारणं आहेत, वाढता मानसिक तणाव, अनियमित झोप, जंक फूड, व्यायामाचा अभाव, आणि काही वेळा अनावश्यक सप्लिमेंट्स व औषधांचे सेवन. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी किंवा हृदयाच्या ठोक्यांतील अॅरिथमिया यांसारख्या आनुवंशिक विकारांचीही शक्यता असते.
वयाच्या तिशीनंतर घ्यावी काळजी
विशेषतः 30 वर्षांनंतर हृदयासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. हे वय करिअर, जबाबदाऱ्या आणि अनेक स्वप्नं पूर्ण करण्याचं असतं, पण याच काळात शरीर आतून थकायला लागतं. त्यामुळे नियमित आरोग्य तपासण्या, रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण आवश्यक आहे.
जीवनशैलीत थोडेसे बदल करून आपण मोठ्या संकटांपासून स्वतःला वाचवू शकतो. तणावाचं व्यवस्थापन, पुरेशी झोप, सगळीकडे धावण्यापेक्षा थोडं थांबून स्वतःकडे बघणं, व्यायाम करणं आणि धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणं हे सगळं तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवण्यात मदत करेल.
कधी-कधी, छातीत दुखणं, श्वास घेणं कठीण होणं, चक्कर येणं किंवा सतत थकवा वाटणं ही लक्षणं छोट्या गोष्टी वाटतात, पण याच गोष्टी तुम्हाला संकेत देत असतात. त्या ऐकणं आणि वेळेवर डॉक्टरांशी संपर्क साधणं याने मोठा धोका टाळता येऊ शकतो.