भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं निसर्गाने भरभरून संपत्ती दिली आहे, पण माणसाच्या हातात ती संपत्ती येत नाही. असंच एक वेगळं आणि दु:खद उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील पन्ना. या शहराचं नाव ऐकलं की डोळ्यांपुढे चमचमते हिरे, त्यांच्या लिलावांची गर्दी, आणि कोट्यवधी रुपयांच्या बोली लावणारे लोक येतात. पण या चकाकीच्या आड, खरंतर खोलवर दडलेली आहे एक वेगळीच गोष्ट, ती म्हणजे गरिबी, उपासमारी आणि दुर्लक्षित जीवन.

पन्ना शहर
पन्ना हे भारतातील एक असं ठिकाण आहे जिथं सर्वाधिक हिऱ्यांच्या खाणी आहेत. या खाणींमधून दरवर्षी लाखो-कोट्यवधी रुपयांचे हिरे बाहेर काढले जातात. सरकारलाही या हिऱ्यांच्या लिलावातून भरपूर महसूल मिळतो. पण या प्रचंड संपत्तीचा थेंबसुद्धा तिथल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
हे हिरे पन्नाच्या जमिनीत जन्म घेतात, पण त्यांचे मोल त्या लोकांना कधीच मिळत नाही जे त्या जमिनीवर स्वतःचा घाम गाळतात. या भागात अनेक छोटे मजूर, शेतकरी, स्त्रिया, तरुण मुले रोज काहीतरी सापडेल या आशेने खाणींच्या आसपास फिरतात. मात्र मिळणाऱ्या मजुरीतून पोट भरणंही कठीण जातं. उपासमार, बेरोजगारी आणि आरोग्य सुविधांचा अभाव ही इथल्या जगण्याची काळी किनार आहे.
पन्नामध्ये एका छोट्याशा हिऱ्याची किंमत लाखोंमध्ये असते, पण गावात अशी अनेक कुटुंबं आहेत जी दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. शाळा नाहीत, रुग्णालयं नाहीत, रस्ते नाहीत, आणि काही गावांमध्ये तर वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या आहेत.
अविकसित पन्नामागील कारण काय?
या संपूर्ण परिस्थितीत सर्वात मोठं दु:खद वास्तव म्हणजे जे लोक खरोखर या हिऱ्यांना शोधून काढतात, त्यांनाच त्यातून काहीच मिळत नाही. त्यांच्या जीवनात ना स्थैर्य आहे, ना सुरक्षितता. काही वेळा एखादा गरीब खाण कामगार एखादा हिऱा सापडल्यावर तो लिलावासाठी सरकारकडे जमा करतो, मात्र त्याच्या बदल्यात मिळालेली रक्कम ही फारच कमी असते.
पन्ना हे शहर भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे देशातील एकमेव हिऱ्यांचं नैसर्गिक स्रोत आहे. मात्र संपत्तीच्या इतक्या जवळ असूनही, एखादं शहर इतकं गरीब का? विकासाची चमक फक्त हिऱ्यांपुरती का मर्यादित राहते? हा प्रश्न अजूनही उपस्थित केला जातो.