ODI पदार्पणातच शून्यावर आउट झाले ‘हे’ 5 दिग्गज क्रिकेटपटू, पण नंतर बनवले ऐतिहासिक रेकॉर्ड! यादीत ‘कॅप्टन कुल’चंही नाव

Published on -

भारतीय क्रिकेट इतिहासात काही अशी नावे आहेत, जी मैदानात उतरताच चाहत्यांच्या हृदयात कायमची घर करतात. त्यांची कामगिरी, जिद्द आणि संघर्षाने ते केवळ खेळाडू राहत नाहीत, तर भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य भाग बनतात. पण गंमत म्हणजे, हीच दिग्गज नावं त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाली होती. ऐकून धक्का बसेल, पण हेच खेळाडू पुढे जाऊन जागतिक क्रिकेटचे दैवत ठरले.

सचिन तेंडुलकर

सुरुवात करूया भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरपासून. 1989 साली पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, अवघ्या 16 वर्षांचा सचिन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि खाते न उघडताच बाद झाला. पण, यानंतर सचिनने तब्बल 18,426 धावांपर्यंत मजल मारली. त्याने 49 शतके ठोकली आणि 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा ऐतिहासिक टप्पाही गाठला.

महेंद्रसिंग धोनी

याच पंक्तीत येतो महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख. चितगावमध्ये 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने पदार्पण केलं, पण पहिल्याच सामन्यात तो देखील शून्यावर बाद झाला. मात्र पुढे धोनीने अशी कामगिरी केली, की आजही त्याचं भारताच्या महान कर्णधारापैकी एक गणलं जातं. 350 एकदिवसीय सामन्यांत 10,773 धावांसह धोनीने स्वतःचं स्थान अमर केलं.

शिखर धवन

शिखर धवन, सुरेश रैना आणि कृष्णमाचारी श्रीकांत ही नावंही या विचित्र यादीत सामील आहेत. धवन 2010 मध्ये पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्लीन बोल्ड झाला. पण पुढील काही वर्षांत त्याने 167 सामन्यांत 6,793 धावा करून आपलं बॅटिंग टॅलेंट सिध्द केलं.

सुरेश रैना

सुरेश रैना देखील 2005 साली श्रीलंकेविरुद्ध पदार्पणात मुरलीधरनकडून शून्यावर बाद झाला, पण पुढे तो भारताच्या मध्यफळीचा आधारस्तंभ बनला. श्रीकांतने तर 1981 मध्ये इंग्लंडविरुद्ध शून्यावर बाद होऊन सुरुवात केली, पण नंतरच्या 146 सामन्यांत त्याने भारतासाठी 4,091 धावा केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!