शांत स्वभाव, उच्च विचार आणि कोमल हृदय असलेली काही माणसं आपल्याला भेटतात, ज्यांच्यात एक वेगळीच चमक असते हीच चमक अंकशास्त्रात “मूलांक 2” असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. ज्यांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा हा अंक. चंद्राचा प्रभाव असलेल्या या लोकांमध्ये भावना, सौंदर्य आणि आत्मियता यांचा सुंदर संगम असतो. ते फसवणूक माफ करतात, पण विसरत नाहीत आणि वेळ आल्यावर आपल्या शांतीच्या मागे दडलेली ताकद दाखवतात.
मूलांक 2 असलेले लोक कसे असतात ?

मूलांक 2 चे लोक खूपच भावनाशील आणि समजूतदार असतात. नातेसंबंध ही त्यांच्यासाठी केवळ औपचारिक गोष्ट नसते, तर मनापासून जपावं असं नातं असतं. म्हणूनच हे लोक सहज कुणाचं दुःख समजू शकतात. त्यांच्यात एक असा गुण असतो की, लोक त्यांच्याजवळ येतात, आपलं मन मोकळं करतात आणि त्यांना वाटतं – “हा मला समजतो”. यांचं बोलणं मधाळ असतं, आणि त्यामुळे अनेकदा ते हृदय जिंकतात.
पण याच भावुकतेमुळे कधी कधी त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागतो. विश्वास ठेवण्यात हे लोक थोडे घाई करत असतात आणि जेव्हा कुणी त्या विश्वासाचा गैरफायदा घेतं, तेव्हा ते फार व्यथित होतात. ते माफ करतात – कारण त्यांचं हृदय मोठं असतं पण ते विसरत नाहीत. आणि योग्य वेळी, अत्यंत शांतपणे उत्तरही देतात. ते रागाने प्रतिक्रिया देत नाहीत, पण त्यांच्या उत्तराचं वजन फार मोठं असतं.
आवड
मूलांक 2 चे लोक कलात्मक असतात – संगीत, लेखन, चित्रकला किंवा अभिनय यामध्ये त्यांना विशेष रस असतो. त्यांच्या जगण्यामध्ये एक सौंदर्य असतं, जे त्यांच्या विचारांत, वागण्यात आणि जीवनशैलीत दिसून येतं. ते भांडण-तंटे टाळतात आणि शांतता राखण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. दोघांमध्ये वाद झाला तरी हे लोक मधे पडून समजूत काढतात. कोणाबद्दल मनात राग ठेवत नाहीत, पण त्यांच्या मनात काय आहे हे अनेकदा कळतही नाही कारण ते फार कमी बोलतात.
आरोग्याच्या दृष्टीने, चंद्राच्या स्थितीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता, किंवा पचनाच्या समस्या त्यांना त्रासदायक ठरू शकतात. ध्यान, ध्यानधारणा आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं हे त्यांच्या साठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जसं की नदी, तलाव, समुद्र – हे त्यांना मानसिक स्थैर्य देतं. रात्री चांदीच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी प्यायल्याने त्यांना मानसिक शांतता मिळते, असं मानलं जातं.
आर्थिकदृष्ट्या यशस्वी असतात
या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या कधीच खूप अडचणीत येत नाहीत. पैसा त्यांच्या आयुष्यात येत राहतो. पण ते खर्चही तितक्याच प्रेमाने करतात – कधी दानात, तर कधी इतरांच्या मदतीसाठी. त्यांचं सामाजिक भान आणि लोकांप्रती असलेली आपुलकी त्यांना इतरांमध्ये विशेष बनवते.