जगात अनेक विमान अपघात झाले आहेत, पण काही अपघात असे आहेत जे केवळ धक्कादायकच नाही तर अजूनही रहस्यांनी भरलेले आहेत. या दुर्घटनांमध्ये संपूर्ण विमाने अचानक गायब झाली, ज्यांचा आजवर कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या विमानांमध्ये शेकडो प्रवासी होते, त्यांचे नातेवाईक आजही त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

अलीकडे भारतातही एक भीषण विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यात 250 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना पुन्हा एकदा जगभरातील त्या अपघातांची आठवण करून देते, ज्यात विमाने उड्डाणानंतर काही वेळातच गायब झाली होती.
MH370
8 मार्च 2014 रोजी मलेशियन एअरलाइन्सचे MH370 विमान क्वालालंपूरहून बीजिंगकडे निघाले होते. विमानात एकूण 239 प्रवासी व क्रू होते. उड्डाणानंतर 38 मिनिटांनी त्याचा हवाई नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला आणि विमान रडारवरून गायब झाले. काही वेळातच ते दक्षिण हिंदी महासागराच्या दिशेने गेले, ही शेवटची माहिती मिळाली होती. तेव्हापासून या विमानाचा काहीच पत्ता लागलेला नाही. अनेक देशांनी संयुक्तपणे शोधमोहीमा राबवल्या, समुद्रतळ शोधून काढले, पण MH370 कुठे गेले हे आजतागायत अज्ञातच आहे.
बर्म्युडा ट्रँगल
5 डिसेंबर 1945 रोजी अमेरिकन नौदलाचे टॉर्पेडो बॉम्बर विमान बर्म्युडा ट्रँगलच्या परिसरात गायब झाले. या विमानात 14 कर्मचारी होते. त्यांचे शोधकार्य सुरू करताना दुसरे विमान पाठवण्यात आले, पण दुर्दैवाने तेही गायब झाले. बर्म्युडा ट्रँगल क्षेत्राप्रती असलेली भीती आणि संशय या घटनेमुळे अधिक गडद झाली.
1962 अमेरिकन लष्करी विमान
1962 मध्ये 93 सैनिक आणि 11 क्रू मेंबर्ससह एक अमेरिकी लष्करी विमान फिलीपिन्सकडे निघाले होते. मात्र ते पॅसिफिक महासागरावरून उड्डाण करताना अचानक गायब झाले. या प्रकरणातही कोणतेही अवशेष सापडलेले नाहीत.
अमेलिया इअरहार्ट
2 जुलै 1937 रोजी, जगप्रसिद्ध महिला पायलट अमेलिया इअरहार्ट आणि तिचे नेव्हिगेटर फ्रेड नूनन यांचे विमान पॅसिफिक महासागरावरून प्रवास करत असताना गायब झाले. दोघेही जगप्रदक्षिणेसाठी निघाले होते. त्यांच्या गायब होण्यावर आजवर अनेक सिद्धांत मांडले गेले, पण कोणताही निश्चित पुरावा समोर आलेला नाही.
या सर्व घटनांत एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे विमाने उडाली, आकाशात गेली, पण पुन्हा कधीच परतली नाहीत. अपघात, तांत्रिक बिघाड, हवामान, मानवीय चूक की काही अनोळखी शक्ती यामागे होती, याचं उत्तर काहीच ठोस नाही. या विमानांमध्ये असलेले शेकडो प्रवासी आजही इतिहासाच्या एका अनुत्तरित प्रकरणाचा भाग आहेत.