पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात एक असं ठिकाण आहे, ज्याच्या नावाने आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात, ते म्हणजे बेगुनकोदर रेल्वे स्टेशन. स्टेशन म्हणजे गाड्यांची ये-जा, वर्दळ, शिट्ट्या आणि प्रवाशांचा गोंगाट, पण या स्टेशनसाठी मात्र गोष्ट काहीशी वेगळी आहे.

इथे एक काळ असा होता, जेव्हा 42 वर्षांपर्यंत एकही गाडी थांबली नाही. आणि कारण? फक्त ‘भूत’! होय, एका अफवेमुळे आणि अनाकलनीय भीतीमुळे हे रेल्वे स्टेशन चक्क 42 वर्ष बंद होतं.
1960 साली सुरू झालेलं हे स्टेशन अवघ्या सात वर्षांत झपाटल्यासारखं वाटू लागलं. 1967 मध्ये स्टेशन मास्टर आणि त्यांच्या कुटुंबाचा अचानक मृत्यू झाला आणि त्याच दरम्यान पांढऱ्या साडीतील एका विचित्र स्त्रीबद्दल स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली.
हळूहळू ही कहाणी गावभर पसरली. इतकंच काय, तर एका रात्री स्टेशन मास्टरने स्वतः एका ‘भूत’ बाईला प्लॅटफॉर्मवर फिरताना पाहिलं होतं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कुटुंबाचा मृतदेह क्वार्टरमध्ये सापडला.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानेच तिथे ट्रेन थांबवणं बंद केलं. गाड्या स्टेशनच्या परिसरातून भरधाव जात राहिल्या, पण थांबल्या नाहीत. रेल्वे कर्मचारीही तिथे पोस्टिंग घ्यायला घाबरत होते. तिथे जाणं म्हणजे संकट ओढवून घेणं, असा समज झाला आणि अशा प्रकारे बेगुनकोदरचं स्टेशन तब्बल 42 वर्षं काळाच्या पडद्याआड गेलं.
2009 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या स्टेशनला नव्याने चालू केलं. मात्र येथे पाच वाजेनंतरच स्टेशन ओस पडलेलं असत. प्रवासी गाड्या थांबतात, पण तिथे कुणी उतरायला धजावत नाही. यानंतर 2017 मध्ये वैज्ञानिकांच्या एका पथकाने या स्टेशनचा रात्री अभ्यास केला.
पोलिसांच्या संरक्षणात त्यांनी बेगुनकोदरला रात्रभर थांबून तपासणी केली आणि त्यांना कोणतीही अलौकिक घटना आढळली नाही. उलट, काही गावकरी हेतूपुरस्सर लाईट बंद करून आवाज करत असल्याचं स्पष्ट झालं. कॅमेरे, सेन्सर्स, कंपास काहीच ‘भूताचं’ अस्तित्व सिद्ध करू शकलं नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांनीदेखील नंतर सांगितलं की, कर्मचाऱ्यांमधील अंधश्रद्धेमुळे अफवा पसरल्या आणि त्या अतिरंजित केल्या गेल्या. ही भीती खरी नव्हती, ती मनातली होती. आजही हे स्टेशन काम करतंय, प्रवासी येथे उतरत आहेत, पण एक काळ होता जेव्हा केवळ अफवेने या ठिकाणाला ‘पछाडलेलं’ बनवलं होतं.