भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात लवकरच एक जबरदस्त भर पडणार आहे. एक असं आधुनिक क्षेपणास्त्र येणार आहे, जे केवळ खांद्यावर वाहून नेता येईल इतकं हलकं असूनही, शत्रूच्या रणगाड्यांना काही क्षणात धुळीला मिळवू शकतं. आणि विशेष म्हणजे, ते केवळ रणांगणावर तंत्रज्ञानाचं प्रतीक ठरणार नाही, तर ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने एक ठोस पाऊल ठरणार आहे.

‘जॅव्हलिन अँटी टँक गाईडेड मिसाईल’
भारतीय संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेच्या प्रसिद्ध कंपन्या रेथिऑन आणि लॉकहीड मार्टिन यांनी संयुक्तपणे तयार केलेलं ‘जॅव्हलिन अँटी टँक गाईडेड मिसाईल’ (Javelin ATGM) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेपणास्त्राची खास गोष्ट म्हणजे, ते वजनाने अवघं 11.8 किलोचं आहे. म्हणजे सैनिक आपल्या खांद्यावर घेऊन सहजपणे याचा वापर करू शकतो. विशेषतः डोंगराळ भागांमधील लढाई किंवा वाळवंटात झालेल्या चकमकींमध्ये हे क्षेपणास्त्र मोठं हत्यार ठरू शकतं.
सध्या भारताच्या सीमांवर सतत तणावाचं वातावरण असतं. अशा वेळी हलकं आणि अचूक लक्ष्य करणं शक्य होणारं क्षेपणास्त्र सैन्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी अत्यावश्यक ठरतं. जॅव्हलिन या बाबतीत अगदी परिपूर्ण आहे. ते 2.5 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या टँकसारख्या धोकादायक लक्ष्यांवर वरून थेट हल्ला करतं, म्हणजेच टँकचा वरचा भाग जो तुलनेत अधिक कमकुवत असतो, तिथे नेमकं धडकतं आणि एका झटक्यात टँक निष्क्रिय करतं.
‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना
या क्षेपणास्त्राच्या खरेदीविषयीची माहिती संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी नुकतीच दिली आहे. त्यांच्या मते, या सौद्यामुळे भारताच्या सुरक्षेचा दर्जा अधिक बळकट होणार आहे. याशिवाय, भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आणि जॅव्हलिन जॉइंट व्हेंचर यांच्यात झालेल्या भागीदारीमुळे भविष्यात हे क्षेपणास्त्र भारतातच बनवण्याची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला एक नवा आयाम मिळेल.
जगभरात जिथे जेव्हलिन क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे, तिथे त्याने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्याच्या अचूकतेमुळे सैनिकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. युद्धभूमीवर जेव्हा वेळ ही सर्वात मोठी संपत्ती असते, तेव्हा अशा क्षेपणास्त्रांची गरज अनन्यसाधारण असते.