स्वप्नं ही आपल्या मनाच्या गूढ आणि गहन जगातली एक खिडकी असते. कित्येक वेळा, अशी स्वप्नं पडतात की त्याचा अर्थ लावताना आपण गोंधळून जातो. विशेषतः, जेव्हा स्वप्नात आपले मृत नातेवाईक दिसतात, तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो “हे काही विशेष संकेत तर नाहीत ना?” अशाच एका शंकाचं समाधान वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी एका प्रवचनात दिलं आहे.

काय म्हणाले प्रेमानंद महाराज?
एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना थेट प्रश्न विचारला की, “माझ्या स्वप्नात माझे मृत नातेवाईक दिसतात, याचा अर्थ काय?” त्यावर महाराजांनी अत्यंत शांत आणि प्रेमळ शब्दांत उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की स्वप्नं मुख्यतः तीन प्रकारांची असतात. काही स्वप्नं अशी असतात ज्यात मृत कुटुंबीय दिसतात, काहींमध्ये देव किंवा संत दर्शन देतात, आणि काही स्वप्नं पूर्णपणे अस्तित्वहीन केवळ आपल्या मनाचे प्रतिबिंब असतात.
माणसाचं मन हे एका वेळी अनेक नात्यांशी जोडलेलं असतं. काही नाती जिवंत असतात, काही आपल्यापासून गेलेली असतात. पण मनाचा संबंध त्या सर्वांशी राहिलेला असतो. म्हणूनच, जेव्हा एखादा मृत नातेवाईक स्वप्नात दिसतो, तेव्हा घाबरायचं काहीच कारण नसतं. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं “याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही चुकीचं केलं आहे, किंवा त्यांच्या आत्म्याला काही हवंय.” त्यामुळे अशा स्वप्नांकडे भीतीने न पाहता त्यातून अध्यात्मिक सकारात्मकतेचा अर्थ घ्यावा.
दान-धर्म करण्याचे महत्व
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात, अशा वेळी आपल्याला एक चांगली सवय लावावी लागते, दान करायची सवय. नियमितपणे पाणी, अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार दुसऱ्यांच्या उपयुक्त ठरेल अशी गोष्ट दान केली, तर ती आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. त्या केवळ धार्मिक विधी नाहीत तर आपल्या श्रद्धेचा आणि आभार मानण्याचा एक सुंदर मार्ग आहे.
म्हणूनच, महाराजांचे मत आहे की आपल्या घरातील वृद्धांचे आपण जिवंतपणी प्रेमाने सेवा करावी आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण ठेवत, गरजूंसाठी काही दान करावे. अशा कृतीतून पूर्वजांनाही समाधान मिळते आणि आपलाही आत्मिक विकास होतो.