भारतातील वैद्यकीय प्रगतीचा प्रवास फारच अद्भुत आहे. आज आपल्याकडे दिल्लीपासून मुंबईपर्यंत, छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत अत्याधुनिक रुग्णालयं उभी आहेत. पण या सर्व यशस्वी प्रवासाची सुरुवात कुठून झाली, हे फार थोड्यांना माहिती आहे. भारतातलं पहिलं रुग्णालय कुठे आणि कधी उभं राहिलं, याची कहाणी जितकी ऐतिहासिक आहे, तितकीच थक्क करणारीही आहे.
देशातील पहिलं हॉस्पिटल

ही सुरुवात झाली होती दक्षिण भारतातील चेन्नई शहरातून ज्याला त्या काळी ‘मद्रास’ म्हणून ओळखलं जायचं. इथेच 1664 साली स्थापन झालं होतं मद्रास जनरल हॉस्पिटल, भारतातलं सर्वात पहिलं आधुनिक रुग्णालय. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आपले अधिकारी आणि सैनिक यांच्या उपचारासाठी हे रुग्णालय उभारलं होतं, पण नंतर त्याचं दार सामान्य नागरिकांसाठीही खुलं झालं.
त्या काळात भारतात आधुनिक वैद्यकीय सेवा नावालाही नव्हत्या. अशा वेळी हे रुग्णालय म्हणजे एक क्रांतिकारी टप्पा होता. इथं लोकांना केवळ उपचारच मिळाले नाहीत, तर आरोग्याच्या बाबतीत नव्या युगाची सुरुवात झाली. मद्रास जनरल हॉस्पिटलने प्राथमिक औषधोपचारांपासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत अनेक पायऱ्या पार केल्या आणि देशातील आरोग्यसेवेचा पाया मजबूत केला.
ब्रिटिश काळात या रुग्णालयाचा विस्तार झाला, नवे विभाग आणि इमारती बांधल्या गेल्या. आधुनिक वैद्यकीय उपकरणं वापरली जाऊ लागली. इतकंच नव्हे तर 1835 साली याच रुग्णालयाच्या संलग्नतेने मद्रास मेडिकल कॉलेज ची स्थापना झाली, जे आजही भारतातील सर्वात जुने वैद्यकीय महाविद्यालय मानलं जातं. हजारो डॉक्टरांनी इथून शिक्षण घेतलं आणि देशभरात आरोग्यसेवेचा प्रसार केला.
आजही कार्यरत आहे हॉस्पिटल-
आजही चेन्नईतील हे ऐतिहासिक रुग्णालय आपल्या वैद्यकीय सेवेने आणि ऐतिहासिक वारशाने लाखो लोकांना आधार देत आहे. त्याच्या जुन्या भिंती आणि परिसर आजही त्या काळाचा इतिहास जिवंत ठेवतो. आधुनिक डॉक्टर आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने हे रुग्णालय आज दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं वैद्यकीय केंद्र बनलं आहे.
ही केवळ एका रुग्णालयाची कहाणी नाही, तर ती भारताच्या आरोग्य इतिहासाची पहिली शिरपेच आहे. याच पायावर आज एम्स, अपोलो, नारायण हेल्थ, फोर्टिस यांसारखी मोठी रुग्णालयं उभी राहू शकली. पण त्यांच्या आधी एक अशी जागा होती, जिथून हा प्रवास सुरू झाला आणि ती म्हणजे मद्रास जनरल हॉस्पिटल.
ती इमारत आजही तिथे दिसून येते आणि तिचं नाव जरी आपल्याला माहिती असलं, तरी तिच्या कहाणीचा तितकासा परिचय अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही.