कधी कधी सिनेसृष्टीत काही गोष्टी अशा घडतात की त्यातूनच एक हिट चित्रपट जन्म घेतो, आणि कलाकारांची भूमिका निवड यामागे दडलेले किस्सेही तितकेच रोचक असतात. अशीच एक रंजक कहाणी आहे सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सुपरहिट चित्रपटाची, ज्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा चित्रपट सुरुवातीला सलमानसाठी नव्हता. खरंतर, तो आधी आमिर खानकडे गेला होता.

आमीर खानने का सोडला ‘बजरंगी भाईजान’?
2015 साली ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन गेला. भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवरून उभं राहिलेलं एक मानवी नातं आणि त्या नात्याचा सुंदर प्रवास त्यात दाखवण्यात आला. पण या भावनिक कथेमागे एक असा क्षण होता, जेव्हा आमिर खानच्या हातात ही स्क्रिप्ट होती. एका मुलाखतीत स्वतः आमिरनेच सांगितले की, जेव्हा त्याने या चित्रपटाची कथा वाचली, तेव्हा ती कथा त्याला प्रचंड भावली, पण त्याच वेळी त्याला वाटलं की हा रोल सलमानसारखा एखादा दिलखुलास माणूसच अधिक योग्यपणे उभा करू शकतो.
आणि मग स्वतः आमिर खानने हा चित्रपट न करता सलमानचं नाव पुढे केलं. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं, कारण बॉलिवूडमध्ये संधी एकमेकांना सोपवणं फारसं पाहायला मिळत नाही. पण आमिरने हे केलं आणि ते योग्यच ठरलं. कारण सलमानने ‘बजरंगी भाईजान’मधील बजरंगीची भूमिका इतक्या सहजतेने आणि प्रामाणिकपणे निभावली की प्रेक्षकांना त्याच्या भूमिकेला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं.
‘बजरंगी भाईजान’ची कमाई
या चित्रपटाने केवळ लोकांच्या मनात घर केलं नाही, तर कमाईच्याही बाबतीत विक्रम प्रस्थापित केले. भारतात सुमारे 320 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने जागतिक स्तरावर तब्बल 922 कोटींचं उत्पन्न मिळवलं. हा सलमानच्या करिअरमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
चित्रपटात करीना कपूरने देखील महत्वाची भूमिका केली, तर नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या खास शैलीत मनोरंजनाची चव वाढवली. पण ज्याने सगळ्यांची मने जिंकली ती होती हर्षाली मल्होत्रा, ‘मुन्नी’. एक शब्दही न बोलता, केवळ भावनांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी संवाद साधत गेली.
आजही जर कोणी हा चित्रपट पाहतो, तर शेवट पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ‘बजरंगी भाईजान’ हा केवळ एक सिनेमा नाही, तर माणुसकीवर, नात्यांवर आणि विश्वासावर आधारलेली एक सुंदर भावना आहे. आणि ही भावना जगासमोर येण्यासाठी आमिरचा सलमानवर ठेवलेला विश्वास हा एक मोठा भाग ठरला. आजही हा चित्रपट तुम्ही Jio Cinema किंवा Netflix वर पाहू शकता.