ओडिशाच्या पुरी शहरात वसलेलं जगन्नाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि पौराणिक कथांनी गुंफलेलं एक अद्भुत विश्व आहे. हजारो भक्त दरवर्षी या मंदिराला भेट देतात, परंतु एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते.

इथे कोणतेही अविवाहित प्रेमी जोडपे एकत्र येऊन दर्शन घेत नाहीत. एवढंच काय, स्थानिक लोक आणि भक्त अजूनही हा नियम पाळतात. यामागे केवळ एक सामाजिक संकेत नाही, तर एक गूढ पौराणिक कथा दडलेली आहे.
हे मंदिर श्रीकृष्णाच्या जगन्नाथ स्वरूपातल्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे, जिथे ते त्यांच्या भावंडांबरोबर बलभद्र आणि सुभद्रासोबत विराजमान आहेत. पण एक गोष्ट मात्र लक्षवेधी ठरते, की इथे राधा राणी कुठेही आढळत नाहीत आणि हेच एक महत्त्वाचं सूत्र आहे ज्यातून या प्रथेची सुरुवात झाली असं मानलं जातं.
पौराणिक कथेनुसार, एकदा राधा राणी जगन्नाथ मंदिरात श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मंदिराच्या दिशेने पाऊल टाकताच, तिथल्या पुजाऱ्याने त्यांना थांबवलं. या वागणुकीचं कारण विचारल्यावर पुजाऱ्याने सांगितलं की राधा राणी श्रीकृष्णाच्या पत्नी नसून केवळ त्यांची प्रियसी आहेत, त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही.
हे ऐकल्यावर राधा राणी खूप रागावल्या. त्यांना प्रचंड दुःख झाले आणि त्यांनी त्या मंदिराला शाप दिला , की यापुढे कोणतेही अविवाहित प्रेमी जोडपे या मंदिरात एकत्र येऊन दर्शन घेऊ शकणार नाही. इतकंच नव्हे, तर त्यांनी असाही शाप दिला की जे जोडपे मंदिरात एकत्र येण्याचा प्रयत्न करतील, त्यांना आयुष्यात खऱ्या प्रेमाची प्राप्ती होणार नाही.
या कथेमुळेच आजही जगन्नाथ मंदिरात प्रेमात असलेले, पण अजून विवाह न झालेले जोडपे एकत्र जाणं टाळतात. ही परंपरा आजच्या आधुनिक काळातही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. प्रेमावर विश्वास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही गोष्ट थोडी कठोर वाटू शकते, पण या मंदिराची ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे.