ग्रामीण भारताच्या हृदयाला भिडणारी आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली ‘पंचायत’ ही वेब सिरीज आता चौथ्या पर्वासह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Amazon Prime Video वर नुकतीच रिलीज झालेली ‘पंचायत 4’ यंदाही आपल्या खास शैलीत गावकुसातील कथा आणि पात्रांचं सहज, भावस्पर्शी दर्शन घडवते. मात्र या वेळी कथा तितकीशी झकास वाटली नसली, तरी कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. आणि या कलाकारांनी या सिजनसाठी किती मानधन घेतलं? याबाबत अनेकजण उत्सुक आहेत.

जितेंद्र कुमार
‘फुलेरा’ गावाचं हे छोटंसं विश्व जिथे सेक्रेटरी अभिषेक त्रिपाठीपासून ते प्रधान मंजू देवीपर्यंत, प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करतं. यंदाच्या सिझनमध्ये ‘सेक्रेटरी’ची भूमिका साकारणाऱ्या जितेंद्र कुमारने सर्वाधिक मानधन मिळवल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला एका भागासाठी तब्बल 70,000 रुपये मिळाले. याच गोष्टीवरून त्याच्या लोकप्रियतेचा आणि अभिनयाच्या ताकदीचा अंदाज येतो.
नीना गुप्ता आणि रघुबीर यादव
याच मालिकेत नीना गुप्ता यांनी मंजू देवी म्हणजेच गावाच्या महिला सरपंचची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयात जो आत्मविश्वास आणि शांत ताकद दिसते, ते फारच भावते. त्यांना प्रत्येक भागासाठी सुमारे 50,000 रुपये मानधन दिलं गेलं आहे. तर प्रधानजींची भूमिका निभावणारे ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव यांना एका भागासाठी 40,000 रुपये मिळाले, आणि त्यांनी आपल्या सहज अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली.
फैजल मलिक
प्रल्हाद चाचाच्या भूमिकेत फैजल मलिक यांनी यावेळी प्रेक्षकांच्या भावना खूप खोलवर स्पर्शल्या. त्याच्या डोळ्यांतून वाहणारा शांत दु:खद अनुभव खूपच प्रभावी ठरला. या भावनिक भूमिकेसाठी त्यांना एका एपिसोडसाठी 20,000 रुपये मिळाले. त्याचप्रमाणे सेक्रेटरीचा विश्वासू मित्र आणि सहाय्यक विकासची भूमिका साकारणारे चंदन रॉय यांनाही त्याच प्रमाणात मानधन मिळालं.
पंचायत या मालिकेचा गाभा म्हणजे त्यातली साधेपणा आणि खराखुरा माणूसपणा. आणि हेच या मालिकेला प्रेक्षकांच्या इतकं जवळचं बनवतं. प्रत्येक पात्र हे आपल्याला ओळखीचं वाटतं. मानधनाच्या आकड्यांपेक्षा मोठं आहे त्यांचं योगदान.कारण ही मालिका फक्त एक मनोरंजनप्रद सिरीज नसून, ती गावकुसातील माणसांची कथा, त्यांचं जगणं आणि त्यांचा दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचवणारा आरसा आहे. त्यामुळे कलाकारांना मिळालेलं मानधन हे त्यांच्या मेहनतीचं आणि समर्पणाचं फळ म्हणावं लागेल.