Astrology Predictions : प्रख्यात ज्योतिषाचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी एक पत्रकार परिषद घेऊन देश व राज्याच्या भविष्यातील राजकीय स्थितीचे अचूक विश्लेषण मांडले. त्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व येत्या काळातही कायम राहील. देशाच्या राजकीय पटावर त्यांची छाप स्पष्टपणे दिसून येईल. निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी गृहमंत्री अमित शहा यांचे राजकीय चातुर्य असून, त्यांच्या रणनीतीने देश अधिक स्थिरतेकडे वाटचाल करेल.
महायुती सरकारचा मार्ग सुकर
राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना डॉ. प्रणाम सागर महाराज म्हणाले की, सध्याचे महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करील. यानंतरच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापनेचा मार्ग खुला होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

२०२५ मंगळ ग्रहाचे वर्ष
डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी २०२५ हे वर्ष मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचे सांगितले. मंगळ ग्रह युद्ध, संघर्ष आणि अस्थिरतेशी संबंधित असल्याने भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव काही काळ कायम राहील. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपली भूमिका ठामपणे मांडत राहील आणि आपले स्थान अधिक मजबूत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या नैसर्गिक स्थितीचा वेध
मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे २०२५ मध्ये देशाच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहील, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे नैसर्गिक दृष्टिकोनातून देशात काही प्रमाणात स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
‘खडे’ आणि मानसिकता
ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या लोकांच्या समस्यांवर त्यांनी अतिशय सूचक भाष्य केले. “खडे घालण्याने नेहमीच फायदा होतो का, हे सांगता येणार नाही; पण जे खडे विकतात, त्यांना मात्र नक्कीच फायदा होतो” या वाक्यातून त्यांनी शंकेखोर मानसिकतेला आणि अंधश्रद्धेला टोला लगावला. खड्याच्या माध्यमातून आपल्या दुर्बल बाजू समाजासमोर उघड होऊ शकते, असा सावध सल्ला त्यांनी दिला.
अघोरी उपायांपासून सावध
डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी स्पष्टपणे नमूद केले की, सध्याच्या काळात काही लोक अघोरी उपायांचा प्रचार करून प्राचीन ज्योतिषशास्त्राची बदनामी करत आहेत. हे शास्त्र नऊ ग्रह आणि नक्षत्रांवर आधारित असून, त्याचा अभ्यास विवेकाने करणे गरजेचे आहे. अशा भ्रामक उपायांपासून समाजाने दूर राहावे आणि विचारपूर्वक वागावे, असा त्यांनी आग्रह धरला.