‘दादांनी’ आम्हाला शब्द दिला आहे; आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही..!

Pragati
Published:

Ahmednagar Politics : सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बहुरंगी लढती देखील दिसतील. श्रीगोंदे मतदार संघात देखील राजकीय उलथापालथ होईल असे चित्र दिसत आहे.

श्रीगोंदा मतदार संघ हा महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाकडेच येईल असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी केलाय. व ही विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणाच त्यांनी यापूर्वीच केली आहे.

तर भाजपकडून विद्यमान आमदार म्हणून बबन पाचपुते यांना किंवा घरात कुणाला आमदारकीचे तिकीट मिळतेय हे देखील महत्वाचे आहे. दरम्यान आम्ही अजित दादांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

त्यावेळी अनुराधा नागवडे यांना विधानसभेचे तिकीट देण्याचा दादांनी आम्हाला शब्द दिला आहे. त्यादृष्टीने विधानसभेसाठी आमची जोरदार तयारी सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही. असे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.

राजेंद्र नागवडे म्हणाले की ,नागवडे कुटुंबाच्या गेल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत पदे असू वा नसो आम्ही कायम समाजकारणाचे काम करून जनतेच्या सुख- दुःखात राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

राजकारणात अनेकांना अनेकवेळा मदत केली पण त्याचा उलटा परिणाम होऊन आमच्याविरोधात षडयंत्रे रचली गेली. आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसून येती विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेत एकही महिला वंचित राहणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) घेणार असून, श्रीगोंदा तालुक्यातील लाभार्थी महिलांचे अर्ज मोफत भरून देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe