Ahmednagar News : निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
इंग्रजांनी पाण्याचे साम्राज्य दिले, मात्र नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले. यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. आता होणाऱ्या आंदोलनात सामील होणार असून पहिला गुन्हा आपल्यावर दाखल करा, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीतील बैठकीत दिला.

पश्चिमेचे पाणी अडवून घाटमाथ्याचे पाणी आल्याशिवाय जायकवाडीलाच्या पाण्याचा हिशोब नाही, असे खासदार लोखंडे यांनी ठणकावून सांगितले. आता राजकारण बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना पाणी द्यायचे आहे. टेलपर्यंतचे बंधारे व तलाव भरण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी बोलावलेल्या या बैठकीला शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, निळवंडे पाटपाणी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, नितीन कापसे, गंगाधर चौधरी, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, सुखलाल गांगवे,
राजेन्द्र सोनवणे, सुरेश तरकसे, संपतराव चौधरी, संजय सदाफळ, रावसाहेब थोरात, वाकचौरे, महेश देशमुख, राजेंद्र रोहम, राजेंद्र कार्ले आदी उपस्थित होते.
…तर अधिकाऱ्यांना चोप
निळवंडेच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या केलवड, आडगाव, खडकेवाके, तळेगाव, चिंचोली, वाकडी, पिंपरी निर्मळ गावातील तलाव व बंधारे पूर्ण भरून देण्यासाठी निळवंडे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांवर मुजोरी करत असल्याचा
आरोप निळवंडे समितीचे विठ्ठल घोरपडे यांनी केला. अधिकाऱ्यांनी दादागिरी केली, तर त्यांना चोप देणार असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.