Ahmednagar Politics : कोपरगाव मतदार संघातील २१ ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी पार पडले. या २१ ग्रामपंचायतींचा निकाल काल सोमवारी (दि. ६) जाहीर झाले. गणेशनगर कारखान्यानंतर विवेक कोल्हे यांनी अपेक्षेप्रमाणे पुणतांबा, वाकडी, चितळी या तीन मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे.
या निमित्ताने राहाता तालुक्यात कोल्हेंनी एन्ट्री केल्याचे आधोरेखीत झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील १७ पैकी १२ ग्रामपंचायतीवर आ. आशुतोष काळे यांच्या गटाचे सरपंच निवडून आले आहेत.

मात्र ब्राह्मणगाव, धोत्रे, बोलकी या तीन ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाचे सरपंच निवडून आले आहेत. पोहेगाव ग्रामपंचायत कोल्हे, औताडे भागीदारीत सरपंच निवडून आला आहे. त्याचबरोबर जवळके ग्रामपंचायतीत देखील कोल्हे गटाने स्थानिक भागीदारीत सरपंच निवडून आणला आहे.
कुंभारी हे ग्रामपंचायत अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. कोपरगाव मतदार संघातील २१ ग्रामपंचायतीच्या बलाबलाचा विचार करता आमदार काळे गट १२ ग्रामपंचायती, कोल्हे गटाने भागीदारीसह कोल्हे ८ ग्रामपंचायतीत वर्चस्व राखण्यात यश मिळवले.
कोल्हे गटाला जास्तीच्या ग्रामपंचायती काबिज करता आल्या नसल्या तरी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यात त्यांनी आमदार काळे गटाची बरोबरी साधली आहे.
ज्यादा सरपंच निवडून आणण्यात कोल्हे गटाला यश आले नसले तरी मोठ्या ग्रामपंचायती राखल्यामुळे कोल्हे गटाचा मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.