Gajanan Kirtikar : सध्या कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेत अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यामुळे कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर देखील उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वी शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा विचार केला तेव्हाच हिंदुत्व राष्ट्रीयत्त्व पुसले, असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली होती. असे म्हणत खंत व्यक्त केली. खेडमध्ये सभा होत असतानाच गजानन कीर्तिकर यांनी टीका करताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम यांचा गौरव करत पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करून शिंदेशाहीला साथ द्या, असे आवाहनही केले आहे. या सभेत सर्वच नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा रत्नागिरीतील खेडमध्ये झाली. दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानावर सभा घेतली होती. त्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती.