शासनाला सात महिन्यांचा कालावधी दिला, तरी देखील आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान असून वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे असे असेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सुपे या ठिकाणी जमलेल्या लाखो मराठा बांधवांना ते संबोधित करत होते.
काल (२२ जानेवारी) नगर शहरातून निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यासंह लाखो मोर्चेकरी सुपे येथे जेवणासाठी थांबले होते. सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर सर्वांची जेवणाची व्यवस्था केली होती. दम्यान याठिकाणी एक फलक लक्षवेधी ठरला होता. मनोज जरांगे पाटील यांचे सुपा येथील मैदानावर आगमन होण्यापूर्वी तरूण मराठा आंदोलकांच्या हातात फलक होते. त्यात ‘आमदार खासदार वाटत आहे चहा, हा मराठ्यांचा सोहळा आहे जरा निरखून पहा’ असे लिहिलेले होते. हा फलक यावेळी लक्ष वेधून घेताना दिसला.

सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकताच पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.
पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी नाष्टा व भोजनाची व्यवस्था केली. तब्बल ५१ स्टॉल लावले गेले होते. यामध्ये केळी, शाबुदाना खिचडी, लापशी, मसाले भात, भाकरी, चपाती, मिरची, बेसण, दाळी आदींच्या गाड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यादरम्यान संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर उसळला होता.
रस्त्याच्या दुतर्फा पाणी टॅंकर उभे केली होती. मोर्चा बरोबरील टॅंकर रोड लगतच्या विहरी, बोरवेलवरुन भरण्याची सोय करण्यात आली, जेवणाची पाकीटे भरुन ती विभागून वाटप करण्यात आली. त्यांतर रात्री हा मोर्चा रांजणगावच्या दिशेने रवाना झाला.