अहिल्यानगर-पुणे महामार्गाची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजू पट्ट्यांचे खचणे, अपूर्ण रस्ता मार्किंग, धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे महामार्गाच्या मजबुतीकरणाची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
रस्त्याची दुरवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी
अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने मोठा जिल्हा असून, या शहरातून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश भागांतून मोठ्या प्रमाणात वाहतूक पुण्याच्या दिशेने जाते. हा महामार्ग वाहतुकीच्या केंद्रस्थानी असल्याने त्यावर प्रचंड वर्दळ असते. पुण्याला जाण्यासाठी चौपदरी रस्ता असला तरी अहिल्यानगर ते शिरूर रस्त्याचे काम मागील 15 वर्षांपासून झाले नाही.

या रस्त्यावर टोल वसुली केली जात असूनही महामार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या काही भागात तीव्र उतार, बाजू पट्ट्यांचे खचणे, धोकादायक वळणांवर कोणतेही सुरक्षा फलक नाहीत, तसेच अपुरे रोड मार्किंग आणि खड्डे आहेत. या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नूतनीकरण थांबले; नवीन महामार्गाच्या कामाचा गोंधळ
रस्त्याच्या रखडलेल्या कामांबाबत चौकशी केल्यानंतर असे समोर आले की, छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाच्या संपूर्ण पुनर्बांधणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान रस्त्याचे दुरुस्तीचे काम पुढे ढकलले गेले आहे.
नवीन महामार्गाचे नियोजन असले तरी सध्याचा महामार्ग अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आहेत. या परिस्थितीत महामार्गाच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याऐवजी संपूर्ण नवीन रस्ता होणार असल्यामुळे रखडलेली देखभाल ही गंभीर बाब आहे.
तत्काळ मजबुतीकरण आणि दुरुस्तीची मागणी
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडे महामार्गाच्या तातडीच्या मजबुतीकरणासाठी मागणी केली आहे. तसेच, महामार्गाच्या दुरुस्तीविषयी अहिल्यानगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.