Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात राज्यघटना बदलण्याची भाषा केली आहे. देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या या दोघांच्या विधानाशी भाजप व नरेंद्र मोदी सहमत आहेत का ? याचा पंतप्रधानांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
![Maharashtra Politics](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Nana-patole.jpg)
टिळक भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाने वचित, मागास, दलित, अल्पसंख्याक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.
सर्वांना समान हक्क, अधिकार व न्याय दिला. परंतु संविधान न मानणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्य परिवारातील संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात.
भाजपच्या जे मनात आहे तेच आज बाहेर आले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांन इंग्रजांच्या विचारांचे असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. याबाबत खुलास होणे गरजेचे आहे, तसेच विवेक देबरॉय व रंजन गोगोई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत.
राहुल गांधींच्या बदनामीसाठी भाजपकडून कोट्यवधींचा खर्च
राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजप कोट्यवधी रुपये खर्च करते. त्यांच्या गांधी आडनावावरून देखील त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला आहे. जे लोक राहुल गांधींच्या आडनावाचा मुद्दा उपस्थित करतात त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे, महागाई, बेरोजगारी या विषयावर बोलावे, असे पटोले म्हणाले.
राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाऊस नसल्याने काही भागात दुबार पेरणी करावी लागली, पण पीक उगवले नाही. दुसरीकडे अतिवृष्टीची नुकसानभरपाईही अजून मिळालेली नाही,
शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. ३६ जिल्ह्यांना १९ पालकमंत्री अशी अवस्था असल्याने प्रशासन ठप्प आहे. या परिस्थितीला राज्यातील सरकारच जबाबदार असून राज्यपालांनी या परिस्थितीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी पटोले यांनी केली