Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळूचोरीचा विषय सध्या गाजत आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊसाहेब मुंढे व कॉन्ट्रक्टर उदय भाऊसाहेब मुंढे यांच्यावर शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी शिवारातील वाळू चोरीचा आरोप झाला आहे.
त्यांच्यावर तसा गुन्हा देखल झाला आहे. त्यामुळे अहमदनगरसह महाराष्ट्रात हा विषय चर्चेचा झाला. मुंगी येथील प्रभारी मंडल अधिकारी अण्णा फुलमाळी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण ? फिर्यादीत असे म्हटले आहे की, पिंगेवाडी येथे ५ जून २०२३ रोजी गट नंबर ९९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर ३० ब्रास वाळुसाठा तत्कालीन मंडल अधिकारी एस. पी. गौडा यांना आढळून आला होता. त्यांनी त्यांचा पंचनामा देखील केला.
त्यानंतर त्यांनी हा साठा पिंगेवाडीच्या सरपंच रंजना अशोक तानवडे यांच्या ताब्यात देत ग्रामपंचायतीच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामासाठी हे वापरावे असे सांगितले. परंतु यातील वाळू चोरी झाल्याचे लक्षात येताच सरपंच रंजना अशोक तानवडे यांनी २४ ऑगस्ट रोजी शेवगावचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली.
२१ नोव्हेंबर २०२३ रोजी मंडल अधिकारी फुलमाळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, गट नंबर ९९ मधील १० ब्रास व शाळेसमोरील ३० पैकी १५ ब्रास अशी २५ ब्रास वाळू चोरी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सरपंच तानवडे यांच्या जबाबावरून व सादर केलेल्या छायाचित्रावरून उदय भाऊसाहेब मुंढे व अरुण भाऊसाहेब मुंढे यांनी त्यांच्याकडील वाहनातून वाळू चोरून नेल्याचे म्हटले.
* न्यायालयात जनहित याचिका
याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल होत नसल्याने सरपंच तानवडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने चौकशी करुन हा गुन्हा दाखल केला आहे.
* खोटे गुन्हे दाखल होत असल्याची भाजप कार्यकर्त्यांची ओरड
वाळूचोरीचे खोटे गुन्हे दाखल होत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. असे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांना त्याची तसे निवेदन दिले आहे.