Ahmednagar Politics : अहमदनगरच्या उत्तरेकडील राजकारणात आता विविध रंग दिसायला लागले आहेत. गाणेच कारखान्यासह काही ग्रामपंचायत ताब्यात घेणाऱ्या कोल्हे यांच्या विरोधात मंत्री विखे पाटील राजकीय मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत.
एकीकडे विखे विरोधक एकत्र दिसत असतानाच विखे पाटील यांनी आपले ‘नियोजन’ कामाला लावले आहे. परंतु यात विखे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष उत्तरेत पेटला आहे.

* विखे म्हणतात ‘कोपरगावमधील गाळ’ तर कोल्हेंकडूनही समाचार
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आशुतोष काळे यांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करायला आलेले होते. यावेळी त्यांनी काळे यांचे कौतुक करत कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कोपरगावकरांनी तळ्यातील गाळ काढला असून आता कोपरगाव तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ आलीय.
व आता त्याची सुरवात देखील करण्यात आलेली आहे अशी टीका माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली होती. महायुतीचा आमदार आशुतोष काळे असून त्यांना माझी गॅरंटी आहे असं त्यांनी म्हटलं होत. तर विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत या वक्तव्यांचा समाचार घेतला.
ते म्हणाले की, विखे यांनी आपल्या स्वतःच्या निवडून येण्याची गॅरंटी आधी घेतली पाहिजे. कोपरगाव मतदार संघातील साडेतीन लाख जनतेने आमची गॅरंटी घेतलेली आहे. विखेंनी आजवर ज्यांची गॅरंटी घेतली त्यांची काय स्थिती झाली हे सर्व जनतेला माहित आहे असे ते म्हणाले.
* आमदार काळे यांच्याकडून विखेंचे गुणगान
आमदार काळे यांनी नवीन मंजूर एमआयडीसी बाबत विखे यांचे कौतुक केले आहे. कोपरगावातील बेरोजगार तरुणांना व विकासाला चालना मिळावी यासाठी गेल्या चार वर्षापासून एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो.
त्याची फलस्वरूपी म्हणून नामदार विखे यांच्या मदतीने एमआयडीसी साठी जागा व एमआयडीसी मंजुरी देण्याचे काम विखे यांनी केले. त्यामुळे कोपरगावकरांच्यावतीने नामदार विखे यांचे आभार मानतो असे गुणगानच काळे यांनी गायले आहे.