Ahmednagar Politics : कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न सोडता अगोदर जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी व जवळाच्या बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी अशोक पठाडे, अविनाश पठाडे, किरण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते पोपट रोडे व कुकडी सीना पाणी संघर्ष समितीच्या वतीने कर्जत येथील कार्यकारी अभियंता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यंदा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस जामखेड तालुक्यात आहे. त्यामुळे चौंडी, दिघी, जवळा परिसरात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी इतर ठिकाणी न सोडता या भागात सोडावे. या भागात दमदार पाऊस नसल्याने नद्या, नाले, बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी बंधाऱ्यात सोडल्यास त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

कुकडीचे पाणी बंधाऱ्यात आल्यास त्याचा फायदा चौंडी, मतेवाडी, आघी, दिघी, जवळा, हळगाव, खडकी, आळजापूर आदी गावांना होणार आहे. या गावांच्या पाणीप्रश्नावर मात करायची असेल तर कुकडीचे पाणी येण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
किमान पावसाळ्यात तरी मिळेल का पाणी ?
आजपर्यंत जवळा बंधाऱ्यात कुकडीचे हक्काचे ०.०७५ टीएमसी पाणी येण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने केली. मात्र, त्याचा फायदा मात्र अजून झाला नाही.
प्रा. राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते असतानाही पाणी आले नाही, त्यामुळे जवळेकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भरघोस मतदान केले. मात्र त्यांनी ही फक्त मागील चार वर्षात एकदाच कुकडीचे पाणी आणले. त्यामुळे पावसाळ्यात का होईना कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.